मुंबई - लांबलेल्या पावसामुळे खरिपाच्या यंदाच्या पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत मंदावल्या आहेत. जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे तेथे दुबार पेरणीचे सावट आहे. पावसाने दडी दिल्याने जलसाठे खालावले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे.
मॉन्सूनच्या आगमनानंतर खरिपाच्या पेरणीला सुरवात होते. हवामानावर आधारित राज्याचे नऊ विभाग असून या विभागांमध्ये 15 जून अखेरपर्यंत सरासरी पाऊस 111.7 मिलीमीटर इतका झाला. जून 2018 अखेर दोन लाख पन्नास हजार हेक्टर (दोन टक्के) इतक्या क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत पाच लाख 78 हजार हेक्टर (चार टक्के) इतकी पेरणीची टक्केवारी होती. राज्यात खरिपाचे एकूण पेरणीक्षेत्र ऊसवगळता 140 लाख 69 हजार हेक्टर इतके आहे.
राज्यात 15 जूनअखेर पाऊस सरासरीच्या तुलनेत एकूण 355 तालुक्यांपैकी 61 तालुक्यांत 25 टक्क्यांपर्यंत, 76 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 77 तालुक्यांत 50 ते 75 टक्के, 47 तालुक्यांत 75 ते 100 टक्के तर 94 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त पाऊस पडला आहे.
यामुळे कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या सर्व कृषी विभागांत पेरण्या मंदावल्या आहेत. पावसाने दडी दिल्याने ज्या क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी पुढील दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे सावट आहे.
भात, खरीप ज्वारी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदीच्या पेरण्या झाल्या आहेत.
पाऊस लांबल्याने जलाशयाची पातळी घसरली आहे. विशेषतः विदर्भातील जलसाठ्यांची पातळी खालावली आहे. तसेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा याच कालावधीत गावे आणि वाड्या-वस्त्यांवर टॅंकरची संख्या वाढली आहे. विदर्भातील अकोला, वाशीम या जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
- राज्यात खरीप पेरणीचे ऊस वगळून एकूण क्षेत्र - 143 लाख 69 हजार हेक्टर
- 15 जूनपर्यंत यंदा पेरणी झालेले क्षेत्र - 2 लाख 49 पन्नास हजार 522 हेक्टर
- राज्याच्या जलाशयातील एकूण पाणीसाठा टक्केवारी - 17.97 टक्के
- गेल्यावर्षी (जून 2017) याच कालावधीत टॅंकरची संख्या - 1176
- यंदा (जून 2018) याच कालावधीत टॅंकरची संख्या - 1801
|