पुणे - राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. कोकणातही पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र, महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यापासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत जोरदार, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमी दाबाचा प्रभाव कमी झाल्याने पावसाचा जोर ओसरल्याची स्थिती आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, विदर्भात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्याची नोंद झाली. उर्वरित भागांत काही अंशी ढगाळ हवामान होते. तर, अधूनमधून ऊन पडल्याचे चित्र होते. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरीही बरसत होत्या.
|