मुख्यमंत्री करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा
मुंबई - येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होईल.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या संदर्भात गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांच्या समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. नागपूर अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा होते. अधिवेशनात होणाऱ्या चर्चेच्या अनुषंगाने निधी देताना मार्च महिना उजाडतो. तसेच पुरवणी मागण्यांमधूनही विदर्भाला न्याय मिळत नाही, अशी सरकारची भावना आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही होते.
नागपूरमधील अधिवेशनासाठी विरोधी पक्षही अनुकूल आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत औपचारिक चर्चा झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत घोषणा केली जाणार आहे.
|