मुंबई - भारतातून बांगलादेशमध्ये पाठविण्यात येणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्कवाढ कमी करण्याची मागणी कृषी फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडे केली.
निर्यातीला फटका बसणार असल्यामुळे आयात शुल्क कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करावी व यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा आशयाचे पत्र खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिले आहे.
भारतातून आयात होणाऱ्या संत्र्यावर बांगलादेशकडून पूर्वी 40 हजार रुपये (20 टनांसाठी) आयात शुल्क आकारले जात होते. मात्र, हे शुल्क वाढवून पाच लाख 40 हजार रुपये करण्यात आले. 15 हजार रुपये प्रतिटन दर अपेक्षित धरला, तर 20 टन संत्र्याची किंमत तीन लाख रुपये होते. मात्र, संत्र्याच्या किमतीपेक्षा दुप्पट आयात शुल्क चुकवावे लागत आहे. त्यामुळे नागपूर संत्र्याच्या निर्यातीवर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली आहे.
|