corona
corona

'सकाळ'ची भूमिका : निर्बंधांचे संकट आवरा

Summary

‘कोविड १९’ विषाणूचा नवा प्रकार (व्हेरियंट) ओमिक्रॉनची लागण जगभरात झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विचारपूर्वक पावले टाकली पाहिजेत.

‘कोविड १९’ विषाणूचा नवा प्रकार (व्हेरियंट) ओमिक्रॉनची लागण जगभरात झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विचारपूर्वक पावले टाकली पाहिजेत. गेल्या ७२ तासांत भारंभार आदेश काढण्यात आले आणि त्या आदेशांच्या तालावर जनतेला नाचावे लागत आहे. आजार राहिला बाजूला, सरकारी आदेशांना आवरा, अशी जनतेची अवस्था होत आहे. गेल्या २१ महिन्यांत अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे गेलेल्या जनतेमध्ये अकारण भीतीची लाट पसरविण्याचे काम सरकारी आदेश करीत आहेत.

दुकाने, बाजारपेठा, कारखाने, कार्यालये, रेल्वे व बस स्थानके, विमानतळ अशा अनंत ठिकाणी सामान्य माणूस वावरत असतो. त्याला ‘कोरोना’ची धास्ती आहे. चार-सहा बेदरकार आणि बेपर्वा नागरिक आहेतही; मात्र सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीय जनता अगदीच बेजबाबदार असल्याचा भ्रम प्रशासकीय पातळीवर दिसतो आहे. त्यामुळेच, ज्याला वाटेल तो अधिकारी आणि सरकारी विभाग वाटेल तसे आदेश काढत आहेत.

महाराष्ट्रात अजून साऱ्या जनतेने लशीची पहिली मात्रा घेतलेली नाही. अशा परिस्थितीत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ४५ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण मे महिन्यात सुरू झाले. तसेच १८ वर्षांखालील वयोगटाचे लसीकरणही झालेले नाही. मार्च २०२० पासूनचे निर्बंध शिथिल होत होते तोवर पुन्हा मार्च २०२१ मध्ये आले आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सारे जनजीवन कोलमडले. त्यातून जनता सावरत आहे.

अशा काळात नियमांमध्ये स्पष्टता, सुलभता आणि सर्वांत मुख्य म्हणजे व्यावहारिकता हवी. ती गेल्या तीन दिवसांत दिसलेली नाही. एका जिल्ह्यात एक नियम आणि दुसऱ्या जिल्ह्यात वेगळाच नियम आहे. शाळा-महाविद्यालये सुरू करायचे कोणी म्हणते आहे; कोणी ‘ओमिक्रॉन’ची भीती घालत आहे. उद्याने कधी खुली-बंद करायची याचा आज एक नियम आहे आणि उद्या दुसराच. सारे निर्बंध बंद खोलीतील वातानुकूलित कार्यालयात ठरत असतील तर, जनतेच्या अडचणी कळणार कशा? लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास करताना सारे काही कडेकोट निर्बंधात उत्तम चालले आहे आहे, असेच भासू शकते.

नव्या लाटेचे संकट घोंघावत असताना जनतेत भीती पसरविण्याचे उद्योग तातडीने बंद केले पाहिजेत. निर्बंध लावायचे असतील, तर ते स्पष्ट हवेत आणि आपण बेटांवर राहात नाही, ही जाणीव ठेवून नियमांची आखणी हवी. जनतेने आधीच्या लाटांमध्येही सरकार-प्रशासनाला साथ दिली; नवे संकट आले, तरी जनता साथ देईलच; तथापि निर्बंधांचे संकट लादणे तातडीने थांबविले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com