अकोला - 'संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यासाठी नाशिक महापालिका किंवा पोलिसांना त्यांचा पत्ता सापडत नसेल तर त्यांनी मला सांगावे. मी त्यांचा पत्ता दाखवितो, मी त्यांना तेथे घेऊन जातो,'' असे म्हणत संभाजी भिडे यांनी लग्न केले असते तर बरे झाले असते, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
नाशिकच्या सभेत संभाजी भिडे यांनी "माझ्या शेतातील आंबे खाल्ले की मुले होतात,' असे खळबळजनक वक्तव्य केले. यावरून सध्या राजकारण तापले आहे. अकोल्यात गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'बेजाबदारपणाचे वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी अंधश्रद्धा पसरवित कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे.
यासंदर्भात भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीने पोलिस तक्रार केली असून त्यावर चौकशीही सुरू झाली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याने भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे,'' असे आंबेडकर म्हणाले.
|