महत्व कशाला? करिअरला की मुलांना?

महत्व कशाला? करिअरला की मुलांना?
महत्व कशाला? करिअरला की मुलांना?

आजचं युग धावपळीचं आहे. कुठंना कुठं रोजच्या रोज हे कोणी ना कोणी म्हणतं. अगदी खरं आहे. प्रत्येकाला करिअरसाठी धावपळ करावी लागतेच आहे. नोकरी, व्यवसाय म्हटल्यानंतर जबाबदारी ही आलीच. छोट्या कुटुंबातील दोघेही नोकरी करणारे असतील तर प्रश्न उपस्थित होतो तो मुलांचा. नोकरी व कुटुंबाकडे लक्ष देताना यातील प्रत्येक घटकाची धावपळ होताना दिसते. एकावेळी दोन दगडांवर पाय ठेवताना तोल जाण्याची शक्यता असते. यामुळे महत्त्व नेमके कशाला द्यायचे? करिअरला की मुलांना...याचा आता शांत बसून विचार करणे गरजेचे बनायला लागले आहे.

पुणे शहरातील गेल्या आठवड्यातील बातमी...
'आई-वडील त्यांच्या कामात व्यग्र असतात; त्यामुळे माझ्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत,' या कारणावरून इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले. या घटनेमुळे पोलिस आणि शाळा प्रशासनासोबतच पालकांची गडबड उडाली. मात्र, या निमित्ताने कामाच्या व्यग्रतेमुळे पालकांकडून मुलांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले असेल. परंतु, खरंच अशी परिस्थिती आज आजूबाजूला अनुभवायला मिळते. कुटुंबातील दोघेही नोकरी करत असतील तर मुलांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असेल अथवा नसेलही. परंतु, इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा फार तर आठ-नऊ वर्षांचा मुलगा अपहरणाचा बनाव करतो, ही खरोखरच गंभीर परिस्थिती आहे. एवढ्या लहान वयाचा मुलगा आपले आई-वडिल आपल्याला वेळ देत नाहीत म्हणून हे पाऊल उचलतो. त्यापूर्वी त्या मुलाच्या मनात किती खळबळ उडाली असेल खरंच, या मुलावर किती परिणाम झाला असावा. परिस्थिती काहीही असो... परंतु, मुलांसाठी वेळ द्यायला हवाच.

बारा-बारा तास नोकरी आणि त्यानंतर मोबाईल. सध्याच्या परिस्थितीत 24 तासही पुरत नाहीत, असे दिसते. लहान मुलेही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. अनेक मुले मोबाईलमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. या मुलांवर अशी वेळ का येते? याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. मुलांकडे दुर्लक्ष केले तर मुले नक्कीच स्वतःला दुसरीकडे गुंतवून घ्यायला शिकायला लागतील, जे परवडणारे नाही.

काही महिन्यांपूर्वीची घटना...
प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पातळीवर असलेल्या आई-वडिलांच्या एकुलत्या मुलाने आत्महत्या केली. या वृत्ताने काही दिवस अनेकांना धस्स झाले. नंतर प्रत्येकजण आपापल्या कामात अडकला. माध्यमांमध्ये एक-दोन दिवस झाले की कुठे ना कुठे अशा प्रकारच्या बातम्या झळकत असतात. बातम्या वाचल्या जातात...त्यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या जातात...पुढील काही दिवस अनेकजण मुलांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करत असणार. पण... हे जास्त दिवस टिकते का? टिकत असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु, टिकत नसेल तर...?

बालपणात प्रत्येक मुलाला आपल्या पालकांसोबत वेळ घालवायचा असतो. एकदा का बालपण सरले की पुढे त्यांचा मित्र परिवार वाढत जातो. पण बालपणात त्यांना आपले पालक जवळ हवे असतात. परंतु, अनेकांना वेळ द्यायला जमत नाही. यामागे विविध कारणे असू शकतात. परंतु, एकदा गेलेली वेळ ही परत येत नसते. कामे महत्वाची आहेत... पण मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा मुले वेगवेगळी पावले उचलताना दिसली तर त्यांना दोष द्यायचा का? याचाही विचार करायला हवा.

कुटुंबातील दोघांना नोकरी करण्याशिवाय पर्याय राहात नाही. पण...नोकरीवरून आल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये गुंतवून घ्यायचे की मुलांना वेळ द्यायचा? महत्व नेमके कशाला द्यायचे करिअरला की मुलांना... याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. प्रत्येक वेळेस पालक व मुलांना दोषी ठरवून चालणार नाही. पण, कुठेतरी नक्कीच चुकत असते.

आपण नक्की काय करायला हवे? वेळेचे विभाजन कसे करायले हवे? तुम्ही काय उपाययोजना करता? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.. आपल्या एका प्रतिक्रियेने एखाद्या मुलाच्या जीवनात नक्कीच आनंद मिळू शकतो. यामुळे आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com