शिर्डी - 'रेल्वेत सुधारणा करण्यासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांची तरतूद केली. महाराष्ट्रात दीड लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकरच सुरू केले जाईल,'' अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.
साईनगर (शिर्डी) ते दादर या साप्ताहिक अतिजलद रेल्वेला मंत्री प्रभू यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. सोलापूर विभागातील रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसाठी एक रुपया लिटर दराने शुद्ध पाणीपुरवठा व कॅशलेस सुविधेचा प्रारंभ त्यांनी केला. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, खासदार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते.
आमच्या प्रयत्नांना साईबाबांच्या आशीर्वादाची साथ मिळावी, यासाठी येथे आल्याचे सांगून मंत्री प्रभू म्हणाले, ""रेल्वेद्वारे चार धाम यात्रा करता यावी, यासाठी सर्वेक्षण सुरू केले. देशाच्या संरक्षणासाठी हिमाचल प्रदेश ते लेह-लडाख रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले. यापूर्वी रेल्वेमार्ग बांधणीचा दैनंदिन वेग तीन किलोमीटर होता. आम्ही तो नऊ किलोमीटरपर्यंत वाढविला. रेल्वेचे 42 टक्के विद्युतीकरण झाले. गेल्या तीन वर्षांत रेल्वेने दोन लाख 75 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण केली.'' साईभक्तांसाठी शक्य त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.
"बॅकलॉग' भरून काढणार
प्रभू म्हणाले, 'रेल्वेबाबत महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा "बॅकलॉग' भरून काढावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत. आजवर रेल्वेबाबत त्याच त्या मागण्या होत होत्या. पूर्वीच्या रेल्वेमंत्र्यांना दिलेली निवेदने कुठे गेली, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मात्र, प्रत्येक निवेदन आणि "ई-मेल'ला उत्तर देण्यास मी तत्पर असतो. पूर्वीची पद्धत बदलली. कामाचा वेग वाढविला. शक्य ती कामे त्वरित करणे व अन्य मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यावर भर दिला.''
|