...तेव्हाच ठरवले हिंदूद्रोही लोकांबरोबर 'युती'चा संसार पुरे: सेना

हिंदूद्रोही लोकांबरोबर 'युती'चा संसार पुरे: सेना
हिंदूद्रोही लोकांबरोबर 'युती'चा संसार पुरे: सेना

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील युती तुटल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने 'सामना'तील अग्रलेखातून भाजपवर कडव्या भाषेत टीका केली आहे. हिंदुत्वाच्या, राममंदिराच्या नावावर सत्तेत आलेल्या सरकारने राममंदिर बांधले नसल्याबद्दल सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय सरकारी कार्यालयात धार्मिक विधी, सण साजरे करण्यास किंवा भिंतीवरील देव-देवतांच्या तसबिरी लावण्यास मनाई करणारा आणि नंतर मागे घेण्यात आलेल्या आदेशाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावेळी असा आदेश काढला तेव्हाच हिंदूद्रोही लोकांबरोबर 'युती'चा संसार पुरे झाला, हे ठरवून टाकल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपबरोबर युती करणार नसल्याचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेनेने 'सामना'तील अग्रलेखातून या विषयावर अत्यंत तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. 'शिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही. शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे. मनात उत्साह, डोक्‍यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे!', अशा शब्दांत शिवेसेनेने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

'आज देशात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. त्याचा देशाला व राज्याला काही फायदा झाला असेल तर शपथ! छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकही आपण राजकीय लाभासाठीच बांधत आहात. पण शिवरायांच्या राष्ट्रनिष्ठच्या विचारांचे काय? शिवरायांनी "धर्म' रक्षणाचे काम केले. धर्माचे राजकारण केले नाही. ते राजे होते, पण रयतेच्या काडीलाही हात लावला नाही. ते देवा-ब्राह्मणांचे रक्षणकर्ते होते. मोगली हल्ल्यातून त्यांनी देव वाचवले. पण सध्याच्या सरकारच्या अंगात मोगल घुसल्याने त्यांनी स्वराज्यातच देवांवर आणि श्रद्धेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मला मुसलमान म्हणा, या वृत्तीने वागून हे स्वतःस निधर्मी समजणार असतील तर ती देशाशी गद्दारी आहे. त्यांना धर्म राखायचा नाही, तर जागा वाढवून खुर्च्या राखायच्या आहेत. त्यांना कश्‍मिरी पंडितांना वाचवायचे नाही, तर मेहबुबा मुफ्तीची आरती ओवाळायची आहे. त्यांना हिंदू रक्षणासाठी कठोर पावले उचलायची नाहीत, तर स्वतःबरोबर देशाची सुंता करून जगात "निधर्मी' म्हणून मिरवायचे आहे. जो फायद्याचा असेल तोच धर्म हे त्यांचे धोरण', असेही अग्रलेखात पुढे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com