मुंबई - राज्याची मतदार यादी देशात नंबर एक असल्याचे सांगून ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत त्यांनी ती नोंदविण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ते बोलत होते.
मुंबईतील तब्बल 11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याच्या प्रकारानंतर सहारिया यांनी सांगितले, की यामध्ये निवडणूक आयोगाची कोणतीही चूक नाही. आयोगाकडून वारंवार जनजागृती करूनही संबंधित मतदारांनी याकडे दुर्लक्ष केले असावे. महाराष्ट्राची मतदार यादी देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत काटेकोर असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. नवीन मतदार नोंदणीचे काम सातत्याने सुरू असते, याचा लाभ मतदारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 2012 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 कोटी 2 लाख मतदार होते. मात्र मतदारांनी केलेले स्थलांतर, मृत व्यक्ती आणि अन्य कारणांमुळे यदांच्या निवडणुकीसाठी हाच आकडा 92 लाखांपर्यंत आला. 2010 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 44 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असताना यंदा मात्र 50 लाखांपेक्षा अधिक, म्हणजेच 6 लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती सहारिया यांनी या वेळी दिली.
|