शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू - उद्धव ठाकरे

uddhav thackeray
uddhav thackeray

गडहिंग्लज - 'शिवसेनेवर दुतोंडी म्हणून आरोप होत आहे. परंतु, शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरण्यासह सत्तेलाही लाथ मारण्याची धमक शिवसेनेत आहे,' असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) नेसरीतील (ता.गडहिंग्लज) शेतकरी मेळाव्यात केले. या मेळाव्यात त्यांनी भाजपावर सडकून टिका करत भाजपा हे शेतकऱ्यांना फसविणारे सरकार असल्याचा आरोपही केला.

ठाकरे म्हणाले, ""राज्यातील सरकार बदलले तरी शेतकऱ्यांची तळमळ आहे तशीच आहे. मग बदल कशाला म्हणायचे. सामान्य जनता व शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शिवसेना कोणावरही तोफ डागण्यास सज्ज आहे. राज्यातील जनता सरकारचे लाभार्थी नव्हे तर जनतेने निवडून दिलेले भाजपाच खरा लाभार्थी आहे. जनता ही मायबाप आहे. जनतेला योजना देवून कोणतेही सरकार उपकार करत नाही. भाजपाने जाहीरातबाजीवर 1100 कोटी रूपये खर्च केले. हाच पैसा रखडलेले सिंचन प्रकल्प व विकासकामांवर खर्च केला असता तर चित्र वेगळे दिसले असते. शेतकरी भिकारी नाही. शेतकऱ्याने पिकवलेल्या सोन्याला योग्य हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे काहीच मागणार नाही. तो या मातीचा राजा आहे."" 

ते म्हणाले, ""राज्याचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाजपाने कर्जमाफी योजना आणली. परंतु, त्याचा लाभ अजून कोणालाही झाला नाही. राज्याच्या दैवताच्या नावाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक भाजपाने केली आहे. शेतकऱ्यांची थट्टा शिवसेना कदापीही खपवून घेणार नाही. नरेंद्र मोदींनी निवडणुकीत भाजपाला सत्ता दिल्यास हमीभाव दीडपटीने वाढवण्याची घोषणा केली. या घोषणेने केवळ त्यांनी मतांचा भाव शेतकऱ्यांकडून घेतला. परंतु, पिकाला भाव देण्याची घोषणा त्यांनी विसरली. मग शिवसेनेला चिड का येवू नये. कर्जमाफी देताना भाजपाने शेतकऱ्यांकडून शपथपत्र घेत आहे. माहिती चुकीची असल्यास तुरूंगवास देण्याचा दम त्यातून दिला आहे. हजारो कोटी बुडवून परदेशात पलायन केलेल्या मल्ल्यावर कोणतीच कारवाई होत नाही आणि येथे मात्र सामान्य शेतकऱ्यालाच तुरूंगात डांबण्याची भाषा भाजपाची आहे. यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना फसविणारे असून येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा.""

यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुनिल शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, संजय मंडलिक, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, दगडू सपकाळ, प्रकाश शिरोडकर आदी उपस्थित होते. विजय देवणे, संग्राम कुपेकर, सुनिल शिंत्रे यांची भाषणे झाली. 

जिल्हा भगवा करा, मग मंत्रीपद
ठाकरे म्हणाले, ""कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रीपद केंव्हा, अशी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद देणार हे नक्की आहे. परंतु, संपूर्ण जिल्हा भगवे करणार त्याचवेळी आम्ही मंत्रीपद देवू. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोकांना "मामा" बनविणारे मंत्री काही उपयोगाचे नाहीत. केवळ मंत्रीपद द्यायचे म्हणून त्यांच्यासारख्यांना मंत्रीपद आम्ही देणार नाही. शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या सच्चा शिवसैनिकाला मंत्रीपद देवू."" 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com