मुंबई - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत मतदान झाले असून, आर्थिक घोडेबाजाराने आघाडी व युतीची सर्व समीकरणे मोडीत काढल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना व भाजपमधील संघर्ष या मतदानातून युतीच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे संकेत आहेत. या दोन्ही मित्रपक्षांतील परस्पर विरोधी कुरघोडीच्या खेळीने राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचेही संकेत मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
भाजप व शिवसेनेने युतीची घोषणा न करता प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, नाशिक व कोकण मतदारसंघात भाजपने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने युतीधर्म मोडीत निघाल्याचे स्पष्ट झाले, तर शिवसेनेने बीड-उस्मानाबाद-लातूर, अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघांत भाजपला धडा शिकवण्याचा विडा उचलल्याची चर्चा दुपारनंतर राजकीय वर्तुळात सुरू होती.
नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने कोकण व नाशिकच्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे, तर बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघात कमालीचा चुरशीचा सामना झाला असून, शिवसेनेला अखेरपर्यंत पक्षादेश मिळाला नसल्याने "हाजीर तो वजीर' अशी मतदारांची अवस्था झाल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात बीडचा उमेदवार विरुद्ध लातूर-उस्मानाबादचा उमेदवार अशी स्थानिक लढाई झाल्याचा दावाही करण्यात येत आहे.
परभणीत मात्र, कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपला संख्याबळाच्या आधारे संधी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतदारांची भूमिका या दोन्ही मतदारसंघात निर्णायक ठरेल, असे सांगितले जाते.
- भाजपचा दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा
- बीडमध्ये शिवसेना, तर परभणीत भाजप किंगमेकर
- विदर्भात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा
|