मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी भाजप शिवसेनेची आगेकूच सुरू असतानाच आता विधान परिषदेतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सदस्यसंख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांच्या ताब्यातील सभापती आणि विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागू शकते.
येत्या जून आणि जुलै महिन्यात विधान परिषदेतील तब्बल 21 जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाच्या सहा, दोन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघातून तर विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या राज्यातील सहापैकी पाच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला असून, शिवसेनेला दोन ठिकाणी फायदा झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या असून भाजपची परिस्थिती "जैसे थे' आहे. "लातूर-बीड-उस्मानाबाद' ची जागा कॉंग्रेसची असताना ती राष्ट्रवादीने लढवल्यामुळे कॉंग्रेसचे एका जागेचे नुकसान झाले आहे.
कॉंग्रेसचे नुकसानच
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी नाशिक (राष्ट्रवादी), परभणी( राष्ट्रवादी), कोकण (राष्ट्रवादी), अमरावती (भाजप), चंद्रपूर-गडचिरोली (भाजप) आणि लातूर-बीड-उस्मानाबाद (कॉंग्रेस) अशी परिस्थिती होती. म्हणजेच शिवसेनेची कोणतीही जागा नसताना राष्ट्रवादीच्या ताब्यातील नाशिक व परभणीच्या जागा त्यांनी मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीने कोकणची एकमेव जागा कायम ठेवली आहे. भाजपने "अमरावती व चंद्रपूर-गडचिरोली'ची जागा कायम राखली आहे. "लातूर बीड उस्मानाबाद'चा निकाल काहीही लागला तरी ही जागा राष्ट्रवादीने लढवल्यामुळे कॉंग्रेसचे एका जागेचे नुकसान झाले आहे.
सत्ताधाऱ्यांना लाभ
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आजच जाहीर झाली आहे. तसेच विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागांसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. विधानसभेत भाजपचे 123, शिवसेना 63, कॉंग्रेस 42 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 41 असे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत सर्वाधिक संख्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा घटणार आहे. राष्ट्रवादीच्या खालोखाल कॉंग्रेसच्याही जागा कमी होणार असून, शिवसेना आणि भाजपच्या जागा वाढणार आहेत.
|