'सरहद'तर्फे "बोडो स्टुडंट्स'ला हजारे यांच्या हस्ते दोन लाखांची देणगी
राळेगणसिद्धी - 'हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नाही. अहिंसेमध्ये खूप मोठी ताकद आहे, हे आम्ही केलेल्या वेगवेगळ्या काळातील आंदोलनांवरून सिद्ध झाले आहे. तरुणांनी अहिंसेचा मार्ग निवडावा, मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन,'' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी सांगितले.
"ऑल बोडो स्टुडंट्स युनियन' आसाममधील बोरागारी (जि. कोक्राझार) "आदर्श गाव' करणार आहे, त्यासाठी प्रारंभिक मदत म्हणून पुण्यातील "सरहद' संस्थेतर्फे संघटनेला दोन लाख रुपयांची देणगी हजारे यांच्या हस्ते देण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. "सरहद'चे संजय नहार, ऑल बोडो स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोरा, सचिव गोविंद बासूमतारी, संजीव शहा, प्रशांत तळणीकर आदी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, 'कोणतेही गाव लगेचच आदर्श होत नसते. गावाचे किंवा राज्याचेही प्रश्न हिंसेच्या मार्गाने सुटत नाहीत, हेच सांगण्यासाठी मी आसामला येणार आहे. अहिंसेच्या मार्गाने विकासाचे काम सुरू करण्यात येईल त्या-त्या गावाला भेट देण्यासाठी मी येईन.''
"फादर ऑफ बोडोज' अशी ओळख असलेल्या उपेंद्रनाथ ब्रह्मा यांचे बोरागारी जन्मगाव आहे, त्यामुळेच आदर्श गाव योजनेसाठी "ऑल बोडो स्टुडंट्स युनियन'ने या गावाची निवड केली आहे. गावातील मुलांना व तरुणांना हिंसेच्या मार्गापासून बाजूला नेण्याचे काम संस्था प्राधान्याने करणार आहे. ग्रामस्वच्छता, दारूबंदी, व्यसनमुक्ती, शिक्षण यावर विशेष भर देऊन काम करणार आहे. "आदर्श गाव' योजनेचा प्रारंभ करण्यासाठी तेथे येण्याचे आश्वासन हजारे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
बोरागारीमध्ये बालग्राम
"सरहद'ने दिलेल्या दोन लाख रुपयांच्या देणगीतून बोरागारीमध्ये बाल ग्रंथालय व बालग्राम उभे करण्यात येणार आहे. या बालग्राममध्ये विविध खेळणी असतील. मुलांना हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या हातात खेळणी देण्यात येणार आहेत!
|