मुंबई - राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी, गणवेश योजनेसाठी पात्र ठरलेल्या सुमारे 36 लाख विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच शाळेत जावे लागत आहे. शिक्षण विभागाने ऐन शाळा सुरू होण्याच्या दिवशीच मोफत गणवेशाबाबत आदेश काढल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या 36 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, यासाठी गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात आठ दिवस अगोदर जमा होणे आवश्यक होते. यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.
2017-18 मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 73 लाख 62 हजार 27 विद्यार्थी मोफत गणवेश योजनेसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 20 हजार 68 विद्यार्थ्यांनी बॅंक खाती उघडली आहेत. यातील 17 लाख 31 हजार 737 विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेश निधीची रक्कम जमा झाली. उर्वरित 5 लाख 88 हजार 331 विद्यार्थ्यांचे बॅंक खाते असूनही गणवेशाचा निधी त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
200 रुपयांची वाढ
मोफत गणवेश योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येतात. दोन गणवेशांसाठी आतापर्यंत 400 रुपये दिले जात होते. यंदा या निधीत दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
|