actor sharad ponkshe's article
actor sharad ponkshe's article

‘देवराम’च्या लोकप्रियतेचं सगळं श्रेय माझं ! (शरद पोंक्षे)

‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत करणं संबंधितांना भाग पडलं!

‘अभिनयक्षेत्रातच जायचं,’ असं मी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्या झाल्याच ठरवलं होतं. त्यासाठी मी मुंबईच्या ‘ड्रामा स्कूल’मध्ये प्रवेशही घेतला. एका नाट्यसंस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊ लागलो आणि हळूहळू शिकता शिकता ‘वरून सगळे सारखे’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकानं अभिनयक्षेत्राचं दार मला खुलं केलं. प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी माझी पहिली मालिका ‘दामिनी’. पत्रकार उदय कारखानीस हे पात्र मी या मालिकेत जवळपास एक हजार ४०० भागांत रंगवलं. प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी या मालिकेची मला खूप मदत झाली. ‘दामिनी’ संपली आणि त्यानंतर २५ वर्षांनंतरची

‘उत्तर-दामिनी’ची कथा सुरू झाली, तेव्हा उदय कारखानीस हे एकमेव पात्र त्यात कायम होतं! या भूमिकेसाठी फार अशी काही मेहनत मला करावी लागली नाही. उदय कारखानीस हा सरळ, सज्जन माणूस होता. कोणतीही भूमिका करताना लेखकानं जे संवाद आणि सीन लिहिलेले असतात, त्यांची खूप मदत अभिनेत्याला होत असते. पत्रकार कसे बोलतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं बिनधास्त असतं, ते कसे निर्भय असतात इत्यादी इत्यादी बाबी मी त्या पात्रात नेमकेपणानं आणल्या. कारण, मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे यांनी हे पात्र असंच अतिशय बारकाईनं रेखाटलं होतं आणि त्यामुळं ते रंगवणं मला सोपं गेलं. अर्थात, या मालिकेतली सगळीच पात्रं प्रेक्षकांना खूप आवडली होती. दूरदर्शनवरची ‘दैनंदिन’ अशी ही पहिलीच मालिका होती आणि या मालिकेमुळं एक अभिनेता म्हणून मी प्रेक्षकांच्या ओळखीचा झालो.
मात्र, अभिनेता म्हणून मला खरी ओळख मिळवून दिली ती ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ या नाटकातल्या शीर्षकभूमिकेनं. या भूमिकेसाठी विनय आपटे यांनी माझी निवड केली होती. तोपर्यंत छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या माझ्यासारख्या अभिनेत्याला एकदम शीर्षकभूमिका देऊन त्यांनी माझ्यावर मोठाच विश्‍वास दाखवला होता, त्याबद्दल मी त्यांचा जन्मभर ऋणी राहीन.  हे नाटक ‘हे राम...नथुराम’ या नावानं मी आता पुन्हा नव्यानं लिहिलं आणि दिग्दर्शितही केलं आहे. कारण, ‘मी नथुराम...’ नाटकाची शीर्षकभूमिका ही त्याला हीरो बनवून लिहिण्यात आलेली होती आणि ती बाब खटकणारीच होती. ‘हे राम...नथुराम’मध्ये तसं नाहीय. नव्यानं लिहिण्यात आलेल्या या नाटकात नथुराम हा एक गुन्हेगार म्हणूनच प्रेक्षकांसमोर सादर केला जातो. आता हे नाटक जास्त वास्तववादी वाटतं. नाटकाचं नेपथ्यही पूर्णतः बदलण्यात आलेलं आहे.

मी अशाच प्रकारच्या भूमिका करणारा अभिनेता आहे, अशी माझी प्रतिमा ‘मी नथुराम...’मुळं निर्माण झाली होती. मात्र, या समजाला छेद देणारा ‘वादळवाट’ या मालिकेतला ‘देवराम खंडागळे’ मला साकारायला मिळाला. ही अगदी विरुद्ध भूमिका होती. या भूमिकेसाठी मला ‘झी मराठी’चा’ उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही सलग तीन वर्षं मिळाला होता. मात्र, त्यानंतर खलनायकाचाच शिक्का माझ्यावर बसला. आपल्याकडं लगेच शिक्के मारले जातात. ‘दामिनी’त माझी सरळ, सज्जन अशी व्यक्तिरेखा होती; त्यामुळं मी देवराम साकारू शकणार नाही, असं काहीजणांना वाटत होतं. मात्र, ‘वादळवाट’चा दिग्दर्शक संगीत कुलकर्णी यानं माझ्यावर त्या वेळी विश्‍वास दाखवला आणि तो म्हणाला ः ‘‘‘देवराम’ची भूमिका शरदच साकारेल’’. खरंतर ‘देवराम’ची भूमिका ही आधी अतिशय ‘सॉफिस्टिकेटेड’ अशी लिहिण्यात आलेली होती. तो शुद्ध मराठी भाषेत बोलणारा दाखवला गेला होता. त्या मालिकेत माझी ‘एंट्री’ ही तब्बल ६०-७० भागांनंतर होती. एव्हाना मालिका लोकप्रिय झालेली होती. त्यातलं चौधरी कुटुंब सगळ्यांना आवडलं होतं. असं असताना देवरामची नव्यानं ‘एंट्री’ झाली आणि तो इतर सगळ्या व्यक्तिरेखांवर स्वार होतंय, हे सगळ्यांनाच कुठंतरी खटकत होतं. सगळ्यांनाच त्याचा त्रास झाला. ‘महिन्यातून दोनच दिवस हा चित्रीकरण करतो; पण प्रत्येत भागाला लोक याचीच वाट बघत असतात,’ हे सहकलाकारांना पटत नव्हतं. जेव्हा मी पहिल्या दिवशी चित्रीकरणाला गेलो, तेव्हा मला असं जाणवलं, की या मालिकेतली सगळीच पात्रं फार सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत आणि हा खलनायकही तसाच दाखवला तर काही मजा येणार नाही. मग मी देवरामची भाषा पूर्णतः बदलली आणि त्याच्या तोंडी सांगली-साताऱ्याकडची भाषा वापरली. काही गावठी शिव्याही द्यायला सुरवात केली! वेशभूषा, रंगभूषा बदलली. चालताना फेंगडा चालायला लागलो. मिशा बदलल्या, भुवया वेड्यावाकड्या केल्या. वेशभूषा नेत्याचीच असल्यानं त्यातून काहीच सपोर्ट मिळणार नव्हता. मात्र, एवढं सगळं करूनही काही तरी ‘मीसिंग’ आहे, असं वाटत होतं. सेटवर गेल्यावर मला तिथं एका महाराजांचा फोटो दिसला आणि त्या फोटोत त्यांचं गंध जसं लावलेलं होतं, तशी एक गंधाची उभी रेषा मी देवरामच्या कपाळी रेखली! आपण नेहमी उजव्या हातानं आरती ओवाळतो आणि डाव्या हातानं घंटी वाजवतो. मात्र, देवरामच्या व्यक्तिरेखेत काहीतरी विचित्रपणा आणण्यासाठी मी उजव्या हातानं घंटी ओवाळल्यासारखी फिरवायचो आणि माझ्या डाव्या हातात आरती असायची! असं ते देवरामचं पात्र उभं राहिलं. ही देवरामची व्यक्तिरेखा उभारायचं संपूर्ण श्रेय माझं आहे, असं मी अभिमानानं सांगेन. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले. लेखकाचं आणि माझं पटेना; त्यामुळं माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, माझी ही भूमिका संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी इतका खाली गेला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत करणं संबंधितांना भाग पडलं! मग

‘कुंकू’ मालिकेतला परशुराम असेल किंवा अन्य कुणी...खलनायकाच्याच भूमिका मला मिळत गेल्या. खलनायकाचा शिक्का पुसणारी भूमिका पुढं मला मिळाली व ती म्हणजे ‘अग्निहोत्र’ या मालिकेमधला महादेव. ही भूमिका करताना फारच मजा आली. तेव्हा मी खूपच व्यग्र असे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माझं नाटक, ‘कुंकू’ आणि ‘भैरोबा’ या माझ्या दोन मालिका त्या वेळी सुरू होत्या. ‘हे असं सगळं असताना ‘अग्निहोत्र’ ही मालिका शरद कसा काय करू शकेल?’ अशी शंका सगळ्यांनाच होती; पण दिग्दर्शकानं माझ्यावर विश्‍वास टाकला. अर्थात, मला ही व्यक्तिरेखा आवडलेलीच होती; त्यामुळं मी इतर बाबींसाठी ‘ॲडजस्टमेंट’ करायला तयार होतो. मुळातला खरा शरद पोंक्षे जसा आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध अशी ती महादेवची भूमिका होती. वास्तवात मी फार आक्रमक आणि वर्चस्व गाजवणारा आहे आणि महादेव हा खूपच घाबरट! एवढा घाबरट की दूर बाहेर कुठं कुत्रं भुंकल्याचा आवाज आला तरी तो घाबरतो आणि त्यातही आख्ख्या वाड्यात तो एकटाच राहत असतो. त्याचे कपडे मळके असतात. परिसरात सगळीकडं वीज आली, तरी त्याला त्याच्या वाड्यात वीज घेण्याची आवश्‍यकता भासत नाही. त्याला टेलिफोनची गरज भासत नाही. अंधार पडला की तो झोपी जातो. सरळ, साधं आणि बाहेरच्या जगाशी फार संबंध नसलेलं असं ते महादेवचं पात्र होतं. मी कोकणातलाच असल्यामुळं मी अशी माणसं वास्तवात बघितलेली आहेत. ‘महादेव’ साकारताना मला त्या निरीक्षणांचा खूप उपयोग झाला. कोकणात एकट्याच राहणाऱ्या अशा माणसांचं वैशिष्ट्य म्हणजे ती हळू आवाजात बोलत नाहीत! ती जोरातच बोलणार !शिवाय, ‘एकटेच असल्यामुळं कोण बघणार आहे आपल्याकडं?’ असा एक विचार त्या माणसांच्या मनात सतत असतो. त्यामुळं व्यवस्थित, नीटनेटके, स्वच्छ कपडे घालावेत, हे त्यांच्या गावीही नसतं. हे सगळं मी बघितलेलं होतं. तेच मी  

‘महादेव’च्या व्यक्तिरेखेत उतरवलं. शिवाय, भूमिका वाचताना तिचे वेगवेगळे रंग कळत जातात...ही भूमिका साकारताना त्या प्रक्रियेचीही खूप मदत मला झाली. अशा विविधरंगी अन्‌ वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका मी आजवर साकारलेल्या आहेत.
त्यानंतर अगदी अलीकडंच (कै) अश्‍विनी एकबोटेबरोबर केलेल्या ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकातली भूमिकाही मला फार आवडली होती. नाटक सुरू झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानं माझी रंगमंचावर ‘एंट्री’ होते. या अर्ध्या तासाच्या कालावधीत नाटकातल्या माझ्या व्यक्तिरेखेच्या चारित्र्याविषयी प्रेक्षकांचं मन आधीच दूषित केलं गेलेलं असतं. त्या नाटकात मी एका बापाची भूमिका साकारली होती. मात्र, माझी ‘एंट्री’ झाल्यानंतर प्रेक्षकांचं त्या व्यक्तिरेखेविषयीचं मत कसकसं बदलत जातं, हे पाहायला खूप मजा येत असे. अनेक प्रेक्षकांनी मला याविषयीची त्यांची मत प्रत्यक्ष येऊन सांगितली.  ‘एका क्षणात’ या नाटकातलीही माझी भूमिका मस्त होती. बॉम्बस्फोटामुळं डोक्‍यावर परिणाम झालेला माणूस त्याच्या बायकोला बहीण समजायला लागतो आणि तिचंही लग्न लावायला निघतो,’ अशी माझी व्यक्तिरेखा त्या नाटकात होती. या व्यक्तिरेखेचं हे वर्णन ऐकूनही अंगावर काटा यावा ! हे नाटक मीच दिग्दर्शित केलं होतं. थोडक्‍यात, ‘दामिनी’मधला अगदीच सरळ-साधा उदय कारखानीस, ‘वादळवाट’मधला बेरकी देवराम खंडागळे, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’मधली शीर्षकभूमिका, ‘अग्निहोत्र’मधला साधाभोळा, गावंढळ, अडाणी महादेव, ‘मोकळा श्‍वास’मधला गरिबीला त्रासलेला आणि त्यातून मुलगी झाली म्हणून दुःख व्यक्त करणारा बाप आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मुलीवर जिवापाड प्रेम करणारा आणि आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारा ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतला बाप... अशा विविधरंगी भूमिका मला साकारायला मिळाल्या. कलाकारानं आपले कान, डोळे नेहमीच उघडे ठेवणं खूप गरजेचं असतं. कलाकार जे बघतो आणि ऐकतो त्या सगळ्यांचा वापर भूमिका साकारताना तो करत असतो. ‘ओरिजनल’ असं काहीच नसतं. कलाकाराला सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करण्याची, त्या गोष्टी मनात साठवण्याची सवय लागते आणि मग ते साठवलेलं सगळं आवश्‍यकतेनुसार त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून नकळतपणे अभिनित होत जातं.

(शब्दांकन - चिन्मयी खरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com