"इश्‍कबाजां'चा दुसरा अध्याय... 

ishkabaj 2nd part
ishkabaj 2nd part

कलाकारांच्या लोकप्रियतेची ग्वाही देणार "दिल बोले ओबेरॉय' 

"एक दुसरे के जरुरी हिस्से हैं, ये एक कहानी के तीन किस्से हैं' असं म्हणत इश्‍कबाज या मालिकेत दाखवलेली तीन भावांची गोष्ट इतकी हीट ठरली, की खास "लोकाग्रहास्तव' त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना घेऊन तिची जत्रेत हरवलेली बहीण शोभावी अशी "दिल बोले ओबेरॉय' ही मालिका येतेय. भारतीय टेलिव्हिजनवरील या वेगळ्या प्रयोगाविषयी... 

गेल्या वर्षी 27 जुलैला इश्‍कबाज ही मालिका सुरू झाली. ओबेरॉय खानदानाची ही गोष्ट होती तीन भावांची. हे तीन भाऊ आणि त्यांचं बॉंडिंग पब्लिकला इतकं अपील झालं, की ती सोशल मीडियावर रॉकिंग ठरली. ट्विटर, फेसबुक, यू-ट्युबवर त्यावर इतक्‍या कमेंट पडताहेत, की... 
या तीन भावासांठी तीन वेगवेगळी लव्हसॉंग आहेत, त्यांचे वेगवेगळे व्हिडीयोही आहेत. ज्याचे रिंगटोन त्यांच्या अनेक फॅनच्या फोनवर वाजताहेत. या तिघांची एण्ट्री जेव्हा होते तेव्हा त्यांचे स्वतःचे असे म्युझिक वाजते. तेही लोकप्रिय आहे. थोडक्‍यात, सब कमाल का चल रहा था, और कॉम्पिटिशन शुरू हो गई. तीही याच मालिकेच्या एक्‍स्टेन्शन असलेल्या मालिकेकडून... 
या नव्या मालिकेचं नाव आहे "दिल बोले ओबेरॉय'. इश्‍कबाज जे पाहतात, त्यांना यामागचा संदर्भ कळेलच. 
ही मालिका सुरू होतेय स्टार प्लसवरच, पण खरं सांगायचं तर ही मालिका जास्त पाहिली जाते हॉट स्टार या ऍपवरच. 
व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून ही स्टारवर आणि हॉट स्टारवर दिसू लागेल. 
भारतीय टेलिव्हिजनवर हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असावा. अमेरिकेत फ्रेंड्‌स या सिरीजचे 10 सीझन झाले आहेत. त्यातील कलाकार आणि पात्रं खूप आवडल्याने त्यांचा एक वेगळा प्रवास दाखवण्यासाठी एक नवी मालिका आखण्यात आली होती, पण ती होती वेबसाईटपुरती मर्यादित. "दिल बोले ओबेरॉय' ही मालिकासुद्धा सुरुवातीला स्टारच्या हॉट स्टार ऍपवरच दाखवावी असं ठरत होतं, पण त्यानंतर वाहिनी आणि प्रॉडक्‍शन हाऊस यांनी मिळून ठरवलं, की ती एक वेगळी मालिकाच असावी आणि ती इश्‍कबाजनंतरच्या स्लॉटलाच अर्धा तास ठेवावी असं ठरलं. 
मालिकेचे प्रोमो वाहिनीवर झळकू लागल्यानंतर इश्‍कबाज मालिकेचा ऑनलाईन प्रेक्षकवर्ग प्रचंड खूश झालाय, की त्यांचे थॅंक्‍यू मेसेज, ट्विटस्‌ अजूनही सुरू आहेत. गुल खान आणि करिश्‍मा जैन यांच्या फोर लायन्स फिल्म या प्रॉडक्‍शन हाऊसने इश्‍कबाज सीरियलची कल्पना स्टार वाहिनीवर मांडली होती. ही मालिका सुरू झाली तेव्हा तीन भावांची गोष्ट असलेली ही मालिका प्रेक्षकांना कितपत रुचेल असं वाटलं होतं, पण शिवाय, ओमकारा आणि रुद्र या तीन ओबेरॉय ब्रदर्सनी या मालिकेतून अशी काही जादू केली, की प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या नायिकांना विसरले. एखादी नायिका मध्यवर्ती असलेली मालिकाच हीट होते हा समज या मालिकेने खोटा ठरवला. 
एकाच मालिकेचं हे एक्‍स्टेन्शन मांडण्याचं पाऊल पहिलं असलं, तरी मागोमाग इतर अनेकही त्यांच्यामागोमाग येऊ शकतील. आपली "कॉपीबाज' मनोवृत्ती लक्षात घेता ते नाकारता येत नाहीच... 

कोण आहेत इश्‍कबाज? 
इश्‍कबाज ही मालिका म्हणजे तीन चुलतभावांची गोष्ट. त्यांचं ओबेरॉय कुटुंब एक प्रतिष्ठित गडगंज श्रीमंती अनुभवत आहे. आजी, काका, काकी, आई, बाबा, बहीण हे तिघे भाऊ आणि मोठा भाऊ शिवायची बायको असं हे यांचं ओबेरॉय खानदान. या खानदानाचा रुबाब तुम्हाला प्रत्यक्ष मालिका पाहताना कळेलच, कारण यातला शिवाय राग आला की एक दिवसाआड आपला किमती फोन फेकून देतो. या कुटुंबाला त्यांच्या दादीने मायेने एकत्र बांधून ठेवलंय. तिचा मान राखत या कुटुंबाला असंच एकसंध ठेवायची जबाबदारी या तीन ओबेरॉय ब्रदर्सवर आहे आणि ते तिघेही ही जबाबदारी मस्त पार पाडतायत. बिझनेसमन शिवायला फक्त खानदान महत्त्वाचं वाटतं. ओमकारा हा शिल्पकलेत पारंगत आहे; तर रुद्र हा कॉलेजला जाणारा फ्लर्टी मुलगा आहे. हे तिघे भाऊ अर्धा तास प्रेक्षकांना बांधून ठेवतात. 
शिवाय आहे नकुल मेहता, ओमकारा आहे कुणाल जयसिंग आणि रुद्र आहे लिनेश माट्टू. 

ऑनलाईन चस्का... 
इश्‍कबाजांना (त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना) घेऊन दुसरी मालिका आणण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यामागे या मालिकेच्या ऑनलाईन प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. कारण ही मालिका ऑनलाईन बघणारा प्रेक्षकवर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. इंडिया फोरमकडून दर आठवड्याला डेली सोपचा "चस्का मीटर' लावला जातो. इथे आपल्या आवडत्या मालिकांना ऑनलाईन मतदान करायचं असतं. त्या मतदानावर त्या आठवड्यातील मालिकांची रॅकिंग ठरते. या रॅकिंगमध्ये नेहमी "इश्‍कबाज' आणि "कुछ रंग प्यार के ऐसे ही' या दोन मालिका आलटूनपालटून नंबर वनला असतात. 
सध्या मालिकेत मोठ्या भावाची म्हणजे "द शिवाय सिंग ओबोरॉय'ची लवस्टोरी दाखवली जातेय. त्यात नकुलबरोबर सुरभी चांदना ही अभिनेत्री त्याच्या पत्नीची भूमिका करतेय. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. अगदी इतकं, की ऑनलाईन प्रेक्षक शिवाय आणि अनिकाचा असा असा सीन घ्या असं चक्क ट्विट करून सांगतात. हिंदी मालिकांमधील आघाडीची लेखिका हरनीत सिंग यांनी मा मालिकेची कथा, पटकथा लिहिलीय आणि प्रसिद्ध संवादलेखक जोडी दिव्य शर्मा आणि अपराजिता शर्मा यांनी या मालिकेचे संवाद लिहिले आहेत. हे तीन भाऊ आणि अनिका या पात्राच्या तोंडचे संवाद ऐकताना इतकं मनोरंजन होतं, की दिन बन जाता है. 
या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे ओब्रो मोमेंट. या मोमेंटमध्ये इतर कुणाला एण्ट्री नसते. घरात स्वयंपाक करणारे शेफ असले तरी या तीन भावांना आपल्या हाताने स्वयंपाक करायला खूप आवडतो. खास करून शिवायचा बिझनेसबरोबरच स्वयंपाक करण्यातही हातखंडा आहे. त्याला कॉण्टिनेंटल रेसिपी खूप छान जमतात आणि अधूनमधून तो पंजाबी डीश करून आपल्या कुटुंबाला खूश करतो. आपल्या बायकोलाही तो आपल्या हातची पण तिची आवडती पुरी-भाजी खायला घालतो. तीही तुपात तळलेली. हे तीन भाऊ ज्या ज्या सीनमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांची एक पंचलाईन ठरलेली असते. दिल बोले ओबेरॉय...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com