सलमान खान... बॉलीवूडचा हा मस्तमौला हिरो. तो त्याची मते नेहमीच स्पष्ट मांडत आला आहे. मैत्री-जिव्हाळा आणि प्रेमाबद्दल सलमान काय कधी बोलेल अशी अपेक्षा नव्हती कुणालाही. तो याबाबतीत सेन्सिटिव्ह मानला जात असला तरी तो याबद्दल फार काही बोलत नाही; पण कालचा प्रसंग थोडा वेगळा होता. तो होता आशा पारेख यांच्या "आशा पारेख... अ हिट गर्ल' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला आला होता. तेव्हा तो म्हणाला, की सायरा आंटी, शम्मी आंटी, साधना आंटी, नंदा आंटी तसेच माझी आई हेलन यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. एकमेकांबद्दल आदर होता. प्रेमही होते. तेव्हाची मैत्री आणि तो जिव्हाळा आता दिसत नाही. आजच्या अभिनेत्रींनी त्यांच्याकडून काही तरी शिकले पाहिजे.
सलमान बोलताना थोडा भावूक झाला, म्हणाला, आशा पारेख यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आलेत. ते सगळे या पुस्तकात आहेत; पण आपल्या आयुष्यातल्या या साऱ्या गोष्टी सांगणे हे फार कठीण... मुळातच आत्मचरित्र लिहिणे ही सोपी बाब नाहीच. मी माझे आत्मचरित्र कधीच लिहू शकणार नाही.
सलमानच्या या म्हणण्यानंतर उपस्थितांच्या मनात त्याच्या आयुष्यातल्या काही प्रसंगाची उजळणी नक्कीच झाली असेल!
आशा पारेख यांचे हे आत्मचरित्र सलमान खानच्या हस्ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले. असे सांगतात की त्यांनी आत्मचरित्र लिहावे हा आग्रह सलमानचाच होता. हेलन आणि आशा पारेख खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे येणे-जाणे होतच असते; पण असे कळते की आशाजींनी एक अट घातली होती की, आत्मचरित्राची प्रस्तावना सलमानने लिहावी. सलमानने त्यांचा आग्रह टाळला नाही. त्यामुळे आत्मचरित्र नाही; पण प्रस्तावना तर लिहिलीय सलमानने.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हेलनसह वहिदा रेहमान, धर्मेंद्र, जितेंद्र, अरुणा इराणी, जॅकी श्रॉफ, प्यारेलाल, इम्रान खान असा बॉलीवूडमधील "गतःकाल' उपस्थित होता!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.