ऑन स्क्रीन : आरआरआर : अद्‍भुत आणि अप्रतिम

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळं आता त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
RRR Movie
RRR MovieSakal
Summary

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळं आता त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळं आता त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. हा चित्रपट सुरुवातीपासूनच खिळवून ठेवणारा आहे. या चित्रपटातील व्हिज्युअल ट्रीट पाहता आपल्याला अवाक् व्हायला होतं. भव्य आणि भडक सेट्स, कलाकारांचा देखणा अभिनय, स्पेशल इफेक्टस, चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी अशा सगळ्याच बाजू छान जमलेल्या आहेत. ‘बाहुबली’च्या तोडीस तोड असा चित्रपट आहे. ही कथा आहे १९२०च्या दशकातील. देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता व लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते. ही कथा आहे दक्षिणेतील स्वातंत्र्यपूर्व आदिलाबाद जिल्ह्यातील. मल्ली या लहान मुलीचा आवाज ब्रिटिशांना आवडतो. त्यामुळं ते तिला बळजबरीनं घेऊन जातात. मग त्या चिमुरडीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडविण्याचं त्यांच्या समाजाचा रक्षक भीमा (ज्युनियर एनटीआर) ठरवतो.

दुसरीकडं ब्रिटिश सरकारमध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम करणारा राम (रामचरण) ब्रिटीशांविरोधात बंड करणाऱ्या क्रांतिकारकांना कठोर शिक्षा देण्याचं काम करत असतो आणि आता त्यांचं मिशन असतं भीमाला पकडण्याचं. राम भीमाला पकडण्याच्या मोहिमेवर निघतो. त्यानं भीमाला पकडलं, तर ब्रिटिश सरकार त्याला विशेष पोलिस पद देणार असते. परंतु हे पद मिळविण्यामागं त्याचा एक खोल आणि छुपा हेतू असतो. राम एका वेगळ्याच हेतूनं ब्रिटिश सरकारमध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम करीत असतो. खरे तर ते दोघेही क्रांतिकारी असतात. एक आग असतो तर दुसरा पाणी. एका बिकट प्रसंगात दोघांची भेट होते. त्यांच्यामध्ये छान मैत्री जुळते. परंतु आपल्या वास्तविकतेबद्दल दोघेही अनभिज्ञ असतात. भीमा आपली शिकार आहे हे रामला ठाऊक नसते, कारण भीमा आपली ओळख लपवून वावरत असतो. त्यांना वास्तविकता कळाल्यावर काय होते, राम आपले मिशन पूर्ण करण्यात यशस्वी होतो का, भीमा चिमुरडी मल्लीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवितो का, रामचा छुपा अजेंडा काय असतो वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात दडलेली आहेत.

दिग्दर्शक राजामौली यांनी अतिभव्य, अप्रतिम व अद्‍भूत असा चित्रपट आणलेला आहे. व्हीएफएक्स तंत्राचा पुरेपूर वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळं तांत्रिक बाबीमध्ये हा चित्रपट सरस झाला आहे. भीमा आणि राम हे दोन महान क्रांतिकारक होते. त्यांच्या इतिहासाचा दाखला देत ही कथा काल्पनिक रचण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यात ते दोघं कधीच एकमेकांना भेटलेले नव्हते. परंतु, हा सगळा चमत्कार राजामौली यांचा आहे. त्यांनी तो धागा उत्तम विणलेला आहे.

ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण या दोघांनी संपूर्ण चित्रपटात कमाल केली आहे. अन्य पात्रंही तितकीच तोलोमालोची असली, तरी त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. दोघांची अॅक्शन, दोघांचा डान्स, संवाद बोलण्याची त्यांची हातोटी, त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या विविध भावभावना छान जमून आलेल्या आहेत. त्यामुळं त्या दोघांना अभिनयात पैकीच्या पैकी मार्क नक्कीच द्यावे लागतील. अजय देवगण, आलिया भट, मकरंद देशपांडे वगैरे कलाकार आपापल्या भूमिकेत छान बसलेले आहेत. तरीही अजयनं ही भूमिका का स्वीकारली असा प्रश्न मनात निर्माण होतो. चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे क्लायमॅक्स आणि अॅक्शन अप्रतिम आहे. व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये व्ही. श्रीनिवास मोहन यांनी भव्यता आणि दिव्यता दर्शविली आहे. तरीही चित्रपटात काही उणिवा आहेत. मात्र चित्रपटाच्या भव्यतेकडं पाहता त्या नगण्य आहेत. एकूणच राजामौली यांचा हा चित्रपट अप्रतिम आणि अद्‍भुत असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com