बीड आगामी खरीप हंगामात रासायनिक खते मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी खत वापराच्या शिफारशीप्रमाणे व पीक रचनेतील बदल लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी 2 लाख 44 हजार 834 मेट्रिक टन खताची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचे 31 हजार मेट्रिक टन खत अद्यापही शिल्लक असून विविध खरीप पिकांसाठी जिल्ह्याकरिता 70 हजार 399 क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या लागवडीसाठी 15 लाख 12 हजार पाकिटांची मागणी करण्यात आली असून यापैकी 13 लाख 98 हजार पाकिटे मंजूर होणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी दिली.
खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक रचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशीप्रमाणे जिल्ह्यासाठी एकूण 2 लाख 44 हजार 834 मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गतवर्षातील 31 हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.
खरिपासाठी बिटी कपाशीच्या 15 लाख 12 हजार बियाणे पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून यात महिको, एमआरसी 7351 (कनक) बियाणाची 2 लाख पाकिटे, अजित 155 ची 3 लाख 40 हजार पाकिटे आणि मलिका 207 ची 2 लाख पाकिटे, तर राशीच्या दीड लाख पाकिटांचे नियोजन उत्पादकांकडून करण्यात आले असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.
खतनिहाय मागणीचा आढावा
आगामी खरिपासाठी जिल्ह्याकरिता 86 हजार 358 मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय 31 हजार 447 मेट्रिक टन डीएपी, 5 हजार 548 मेट्रिक टन एसएसपी, 28 हजार 694 एमओपी खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय संयुक्त खतांमध्ये 15ः15ः15- 7 हजार 328 मेट्रिक टन, 20ः20ः0-14 हजार 810 मेट्रिक टन, 19ः19ः19-451 मेट्रिक टन, 10ः26ः26- 9 हजार 28 मेट्रिक टन, 24ः24ः0- 8 हजार 36 मेट्रिक टन, 12ः32ः16- 5 हजार 603 मेट्रिक टन, 14ः35ः14- 2 हजार 197 मेट्रिक टन, 16ः16ः16- 77 मेट्रिक टन, 14ः28ः14-1 हजार 83 मेट्रिक टन म्हणजेच सर्व प्रकारच्या संयुक्त खताची एकूण 92 हजार 760 मेट्रिक टन इतकी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मिश्रखतांमध्ये 18ः18ः10 या खताची 5 हजार 693 क्विंटल इतकी मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत खरिपासाठी जिल्ह्यात खतांचा सरासरी 1 लाख 34 हजार 110 क्विंटल वापर करण्यात आला आहे. या सरासरी वापराच्या जवळपास दुप्पट खताची मागणी कृषी विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.
बारा भरारी पथके नियुक्त
आगामी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके वेळेवर, तसेच दर्जेदार व रास्त दराने मिळण्यासाठी 12 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक याप्रमाणे भरारी पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत जिल्ह्यात पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वाटप व संनियंत्रण करण्यात येते.
खरिपासाठी बियाणे मागणीचा आढावा (आकडे क्विंटलमध्ये)
पिकाचे नाव-गतवर्षीचा वापर-यंदासाठीची मागणी-
भात-4-47-
ज्वारी-1229-1106-
बाजरी-2200-2067-
मका-302-1853-
तूर-1309-1085-
मूग-509-920-
उडीद-1510-1680-
तीळ-45-58-
सुर्यफूल-00-66-
सोयाबीन-49260-54266-
भुईमूग-1170-960-
एकूण-57538-64108
|