यंदा 82 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार
उस्मानाबाद - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा 82 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 15 हजार 450 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून, 52 हजार टनाच्या खताची मागणी मंजूर झाली आहे.
मॉन्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर प्रशासन यंत्रणा तयारीला लागली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, तसेच खते वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या वर्षी पाऊसही चांगला होईल, असा अंदाज आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पेरणी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकूण 75 हजार 756 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. महाबीजकडून 36 हजार 709 क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून तीन हजार क्विंटल तर खासगी कंपन्याकडून 43 हजार 48 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे; तर आतापर्यंत 15 हजार 450 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. मॉन्सून लवकर दाखल होणार असल्याने प्रशासनाने सर्वच विभागांना बियाणे तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
52 हजार टन खताचा पुरवठा होणार
यंदाच्या हंगामात उसाची लागवड वाढली आहे. उसाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात दिली जात असल्याने खताची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे युरिया 35 हजार 650 टन, डीएपी 13 हजार 800 टन, एसएसपी 14 हजार 950, एमओपी दोन हजार 415 टनांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच तब्बल एक लाख 14 हजार 295 क्विंटल खताची मागणी करण्यात आली आहे; तर 52 हजार 700 टनांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षातील तब्बल 10 हजार 291 टन खताचा साठा शिल्लक आहे.
तालुका स्तरावर कक्ष कार्यरत
बियाणे तसेच खतातील भेसळ रोखण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता कक्ष तयार करण्यात आले आहेत. खते, बियाणांमध्ये काही संशयास्पद आढळून आले, तर शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावरील कक्षात जाऊन यासंबंधीची तक्रार देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
|