हवामान बदल, तंत्रज्ञानाधारित शेती परिषदेला सुरवात
नवीन नांदेड - जागतिक हवामान बदलामुळे शेती व्यवसाय परवडणारा कसा होईल, यावर संशोधनाची गरज असून, शेतकऱ्यांच्या साशंकतेमुळे आणि नगदी पिकांवरील कीटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सोमवारी येथे केले.
जागतिक हवामान बदल आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा या महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थेत (एसजीजीएस) झाले. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिषदेला देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञांनी हजेरी लावली आहे. उद्घाटन कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, "एसजीजीएस'च्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मिलिंद पोहनेरकर, त्रिलोसिंग जबिंदा, अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक डी. क्लिंटन शॉक, फ्रान्समधील फ्रेंच जिऑलॉजिकल सर्व्हेचे डॉ. ऍड्रीयन सेल्स, हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग केंद्राचे संचालक डॉ. कृष्णामूर्ती, पुण्याच्या भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. आर. कृष्णन, विद्यापीठेच प्र - कुलगुरू डॉ. जी. एन. शिंदे, "एसजीजीएस'चे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे यांची उपस्थिती होती.
हैदराबादच्या केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सी. एच. श्रीनिवासराव यांनी जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसमोरील आव्हानांची चर्चा केली. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सल्लागार डॉ. संजीव राव यांनी हवामान बदल, शेती विषयातील संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून भरीव आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते अशी ग्वाही दिली.
|