अहमदपूर - लग्नात हुंडा घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी सरकार तसेच सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना बळ देणारी घटना अहमदपूरमध्ये मंगळवारी (ता.29) घडली. मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद शेळके यांनी 23 वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नात घेतलेला नुकताच सासऱ्यांना परत करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
प्रा. गोविंद शेळके यांचे भाचे कैलास व गीताश्री यांचा विवाह काल येथे अतिशय साध्या पद्धतीने झाला. आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव आदी या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. शेळके यांनी त्यांच्या लग्नात घेतलेला हुंडा परत करीत असल्याचे जाहीर केले. त्यांनी 23 वर्षांपूर्वी लग्नात 51 हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यानुसार तितक्याच रकमेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सासरे बाबूराव पवार यांना प्रा. शेळके यांनी दिला. तसेच लग्नमंडपात एक दानपेटी ठेवून त्यात पडणारी संपूर्ण रक्कम जिल्ह्यातील हासेगाव येथील रवी बापटले यांच्या "एचआयव्हीबाधित' मुलांच्या सेवालयाला मदत स्वरूपात दिली. भाच्याच्या विवाहात कुठलीही भेटवस्तू किंवा आहेर न स्वीकारता ती रक्कम थेट सेवालयाच्या मदत पेटीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
कैलास व गीताश्री यांच्या मंगळवारी झालेल्या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा विवाह शिवधर्म पद्धतीनुसार झाला. साखरपुडा, शालअंगठी, मुहूर्त, पत्रिका, हुंडा, बस्ता, घोडा, शेवंती, रुख्वत, कपडे, डीजे, वरात या प्रथा नाकारून या गोष्टींवरील अवाजवी खर्चाला फाटा देण्यात आला. या विवाहात गुरुजी, होमहवन, यज्ञ नव्हता. अक्षतांऐवजी टाळ्या तसेच फुलांऐवजी ग्रंथभेट देऊन येणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
|