लातूर - लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्यक सेवांसह सुपरस्पेशालिटी रुग्णवाहिका असलेला डबा जोडावा, अशी मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली होती, त्याची दखल अवघ्या एका वर्षातच घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वेला अत्याधुनिक सेवा असलेला रुग्णवाहिका डबा सुरू केला आहे.
भारतीय रेल्वेचे जाळे हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरले आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे दळणवळणासह पर्यटन व नागरिकांच्या प्रवासाची मोठी सोय झाली आहे. सुरक्षिततेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामध्ये अनेक आजारांनी पीडित प्रवासी प्रवास करतात, अशा रुग्णांच्या जीवितास प्रवासादरम्यान अनेकवेळा धोके निर्माण झाले आहेत.
यामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये सुपरस्पेशालिटी दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणारा एक रुग्णवाहिका डबा जोडण्याची मागणी डॉ. सुनील गायकवाड यांनी लोकसभेत गेल्या वर्षी अधिवेशनात केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही याकडे लक्ष वेधून घेतले होते. या मागणीची दखल घेत तत्काळ सुरेश प्रभू यांनी या कामासाठी रेल्वे प्रशासनाला आदेश दिले होते. याची सुरवातही श्री. प्रभू यांच्या हस्ते करण्यात आली आहे. डॉ. सुनील गायकवाड यांनी केलेल्या या मागणीची पूर्तता झाल्याने अनेक हृदय, किडनी यासह विविध प्रकारच्या आजारी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
|