नांदेड - राजकीय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे समाजाचे काही भले होत नाही. त्यामुळे देशातील सर्व समाजांचे राजकीय आरक्षण रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.
रिपब्लिकन सेनेच्या मराठवाडास्तरीय बैठकीसाठी आनंदराज आंबेडकर येथे आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे व पुतळ्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. कृती आराखड्यात पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट असताना ती अडीचशे फुटांवर आणण्यात आली. खर्च मात्र वाढविण्यात आला. यामागचे नेमके गमक काय, हे विचारण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. पुतळा सरकारला करता येत नसेल, तर आंबेडकरी जनतेच्या ताब्यात हे काम द्यावे. स्वखर्चाने आम्ही तो उभारू.
आगामी निवडणुकांसाठी रिपब्लिकन सेनेचा वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकार हे संविधानविरोधी असून संविधानाला विरोध करणारे आमचे शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 मधील निवडणुका या परिवर्तनाची नांदी असतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
|