आयटीआय प्रवेशासाठी साडेबाराशे अर्ज दाखल

आयटीआय प्रवेशासाठी साडेबाराशे अर्ज दाखल

दोन जुलैपर्यंत मुदत; ५१ ट्रेड, ११२६ जागा  

औरंगाबाद - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया १९ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर म्हणजेच २४ जूननंतर प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याने आयटीआयसाठी साडेबाराशेवर अर्ज आले आहेत. विद्यार्थ्यांना दोन जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. 

गुरुवार (ता. २९) अखेर राज्यात एकूण तीन लाख तर औरंगाबादेत बाराशे पन्नास विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी अर्ज दाखल केले आहेत. येथील आयटीआय संस्थेत ५१ ट्रेडसाठी एकूण ११२६ जागा आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवेशाची माहिती पुस्तिका, शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज निश्‍चिती प्रक्रिया तीन जुलैपर्यंत होणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अर्ज स्वीकृती केंद्र असणार आहेत. अर्ज स्वीकृती केंद्रात माहिती पुस्तिका घेऊन ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकृती आणि प्रवेश निश्‍चिती करू शकतील. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आयटीआयमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी करायची आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर त्यांच्या सुविधेसाठी आयटीआयमध्ये सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. २४ जून रोजी शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या असल्या, तरी अनेक विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका आणि कलचाचणीचे निकालपत्रक मिळालेले नव्हते. परिणामी मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात नोंदणी आणि अर्ज कन्फर्मेशनसाठी गर्दी होऊ शकते, असेही सांगण्यात आले. 

मराठवाड्यात एकूण ८२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ३० खासगी आयटीआय संस्था आहेत. या संस्थांमध्ये सुमारे १४ हजारांपेक्षा जागांसाठी  प्रवेश दिले जाणार आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी २० हजार ९०७ विद्यार्थ्यांचे अर्ज
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी दोन दिवस मुदतवाढ दिल्यानंतर अंतिम दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेशासाठी २० हजार ९०७ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून ऑनलाइन करण्यात आले. ही प्रवेश प्रक्रिया ६ जूनपासून सुरू करण्यात आली होती. मनपा हद्दीतील १०४ महाविद्यालयांत एकूण २२ हजार ९४० जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. महाविद्यालयात शुक्रवार (ता. ३०) पासून कोट्यातील प्रवेश सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिली.

प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारखेपर्यंत झालेली नोंदणी पाहता, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या याचा विचार करत ऑनलाइन प्रवेशास अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. अंतिम तारखेपर्यंत २० हजार ९०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, असे असले तरी प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदलही होण्याची शक्‍यता आहे. 
- वैजनाथ खांडके, विभागीय शिक्षण उपसंचालक. औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com