बोंडअळी संपविण्यासाठी ‘फरदड’चा मोह टाळा

बोंडअळी संपविण्यासाठी ‘फरदड’चा मोह टाळा

औरंगाबाद - शेंदरी बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले आहे. येणाऱ्या खरिपात कापशीचे उत्पन्न व्हावे आणि बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्याचा मोह टाळावा. सध्या पऱ्हाट्यासह पूर्ण पीक काढून टाकण्याचा सल्ला येथील विभागीय कृषी विस्तार केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती; मात्र बोंडअळीने कापाशीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानभरपाईसाठी जागोजागी आंदोलने केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर विभागीय कृषी विस्तार केंद्रामार्फत येणारा हंगाम चांगला करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. विभागीय कृषी विस्तारक डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले, ओलिताखालील क्षेत्रात ठिबकखाली असलेल्या जमिनीतील कापूस शक्‍य तितक्‍या लवकर पऱ्हाटीसह उपटून नष्ट केला पाहिजे. कोरडवाहू क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना फरदड घेता येत नाही, असे असले तरी शक्‍य तितक्‍या लवकर कपाशी उपटून टाकावी. फरदड घेण्याचा मोह टाळून तो उपटून जाळून टाकणे हा एकमेव पर्याय आता राहिला आहे. त्यामुळे पिकावर जोपासलेल्या बोंडअळी, अंडी, कोष नष्ट होण्याला मदत होईल. जमीन नांगरून मोकळी केल्याने जमिनीत सुप्तावस्थेत असलेली ही कीडदेखील नष्ट होईल. एकट्या शेतकऱ्याने करण्यासारखी ही उपाययोजना नसून गावातील कापूस लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हे काम मोहीम स्वरूपात करावे लागणार आहे; तरच बऱ्याच अंशी कापसाला शेंदरी बोंडअळीपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवता येईल व येणारा खरीप कापूस उत्पादकांसाठी फायदेशीर राहील, असे स्पष्ट केले. 

काय आहे फरदड?
फरदड कापूस म्हणजे एकदा पीक घेतल्यानंतर बीटी कापूस बियाणांचा पुन्हा बहार धरला जातो. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीच फरदड घेण्याकडे ओढा असतो. कापूस पिकाला जोमाने वाढविण्यासाठी खते, पाणी, कीटकनाशकाचे पुन्हा व्यवस्थापन केले जाते आणि उन्हाळ्यापर्यंत कापसाचे पीक घेतले जाते; मात्र या फरदड घेण्याच्या नादात बोंडावर जगणाऱ्या अळीलाही आयतेच खाद्य मिळते आणि तीही जगते आणि पुढच्या हंगामात तिचा प्रादुर्भाव होण्यास हातभार लागतो. या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे खाद्य कापूस पीकच आहे. शेतकरी जितके दिवस शेतात कापूस उभा ठेवतील तितके दिवस ही कीड जोपासल्यासारखेच आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी शेतातील कापसाचे पीक नष्ट करणे आवश्‍यक आहे. या शिवाय बोंडअळीपासून वाचविण्यासाठी बीटी बियाणांभोवताली नॉन बीटी बियाणांची लागवड करणे गरजेचे असल्याचे विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी मत व्यक्‍त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com