औरंगाबाद - मराठवाड्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात वीज पडून शेतकरी ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.
थंडीचे आगमन झालेले असताना गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली असून, औरंगाबाद शहर व जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पाऊस झाला. आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात आज पाऊस झाला. शेतात ठेवलेले सोयाबीन, मक्याचेही नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातील सेनगावात हलक्या सरी कोसळल्या. बीड तालुक्यातील पाली परिसरासह आष्टी व धारूर तालुक्यांतील काही भागात दुपारनंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. देवणी (जि. लातूर) तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सय्यदपूर येथील शेतकरी शिवाजी बिरादार हे पत्नीसह दुपारनंतर शेतात गेले होते. वादळी वाऱ्यामुळे त्यांनी पत्नीला आधी घरी पाठवले. जनावरे घेऊन ते घराकडे निघाले असता वीज पडल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
|