औरंगाबाद - अवयवदान चळवळीतील मोठे योगदान देणाऱ्या औरंगाबाद शहराने प्रत्यारोपणातही मैलाचा दगड गाठला आहे. या अवयवदानातून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एमजीएम रुग्णालयात पहिल्यांदा करण्यात आली. पंधरा तासांच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर सुरतची महिला (वय 59) पाचव्या दिवशी ठणठणीत बरी झाली आहे, अशी माहिती एमजीएमचे उपाधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, 'अवयवदानाबद्दल कळाल्यानंतर पंधरा रुग्णांच्या प्रतीक्षा यादीची चाचपणी झाली. यातील सहा जणांना हे यकृत जुळणारे होते. त्यानुसार सुरतच्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना संपर्क करण्यात आला. त्यांच्या संमतीनंतर सकाळी या महिलेचे यकृत काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, दुसऱ्या रुग्णालयात अवयवदानात मिळालेल्या यकृत काढण्याची प्रक्रिया मुंबईहून आलेल्या ग्लोबल हॉस्पिटलची टीम करत होती. शनिवारी (ता. 25) दुपारी बाराच्या सुमारास एमजीएममध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरवात झाली. रात्री अकरा वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. प्रत्यारोपणानंतर बारा तासांनी व्हेंटिलेटर काढण्यात आले; तर 48 तासांनंतर या महिलेने आहार घेतला.'' या शस्त्रक्रियेत डॉ. सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वात डॉ. नारायण सानप, डॉ. अशोक मोहिते, डॉ. नागेश जंबुरे, डॉ. संहिता कुलकर्णी आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा सहभाग होता.
|