प्लॅस्टिक पिशवी, नको रे बाबा!

Plastic-bag
Plastic-bag

औरंगाबाद - राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली. या निर्णयाची शहरात हॉटेल व्यासायिकांपासून ते फळविक्रेते, किराणा दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. एरवी प्लॅस्टिक पिशव्यांमधून दिले जाणारे सामान आता कागदी किंवा कापडी पिशव्यांमध्ये दिले जात आहे.  

शासनाच्या या निर्णयाचा प्लॅस्टिक उत्पादक आणि विक्रेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, बहुसंख्य नागरिकांना अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकची सवय लागलेली आहे. अनेक जण बाजारात रिकाम्या हाती जातात आणि प्लॅस्टिक पिशव्यांत शॉपिंग करून येतात. प्लॅस्टिकबंदीनंतर बाजारपेठेत नेमके काय चित्र आहे, याची पाहणी ‘सकाळ’ने केली. त्यात सकारात्मक चित्र आढळून आले. बहुतांश नागरिक, व्यापारी, विक्रेत्यांनी शासनाचा हा निर्णय स्वीकारला आहे.

आम्ही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे थोडा खर्च वाढला आहे; पण पर्यावरणाचा विचार करता खर्चाचा मुद्दा गौण आहे. हॉटेल असोसिएशनतर्फे आम्ही सर्वांना प्लॅस्टिकबंदीचे आवाहन केले होते. त्याला ग्राहकसुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत.
-शिवाजी मनगटे, अध्यक्ष हॉटेल असोसिएशन,

प्लॅस्टिकबंदी विरोधात आमचा बेमुदत बंद सुरू आहे; मात्र शहरात अजूनही प्लॅस्टिक वापरण्यात येत आहे. प्लॅस्टिक सरकट वापर बंद केल्यामुळे छोट्या व्यावसायिकांसह इतरांचे मोठे नुकसान होत आहे. आम्ही बंद ठेवल्यानंतर शहरातील लोक गुजरात व इतर ठिकाणांहून माल आणत आपला व्यवहार सुरू ठेवत आहेत. सरकारने त्वरित पर्यायी व्यवस्था करावी.
-ओमप्रकाश भुतडा, अध्यक्ष, औरंगाबाद प्लॅस्टिक शॉप असोसिएशन. 

नेमके काय आढळले?
फळविक्रेते - शहरातील प्रमुख बाजारपेठेतील फळ आणि भाजीविक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांना कायमचीच सुटी दिली आहे. कापडी किंवा कागदी पिशव्यांमध्येच ते ग्राहकांना भाजीपाला आणि फळं देत आहेत. बंदीमुळे ग्राहकही त्यांच्याकडे प्लॅस्टिक पिशवी मागत नसल्याचे आढळून आले.

हॉटेल्स - प्लॅस्टिकबंदीमुळे हॉटेल्समधील पार्सल सुविधेवर परिणाम झाल्याचे दिसले. पूर्वी ग्राहकांना प्लॅस्टिक पिशवी, थर्माकोल, प्लॅस्टिक द्रोण, डब्यांत पार्सल दिले जात होते; पण कागदी द्रोणातून अन्न झिरपत असल्याने हॉटेल्स व्यावसायिकांची अडचण झाली आहे. चार ठिकाणी ‘सकाळ’ बातमीदाराला पार्सल नाकारण्यात आले; तर एका ठिकाणी केवळ ओळखीच्याच ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पार्सल दिले जात असल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

बिअर आणि वाईन शॉपीवर कापडीपिशव्यांमध्ये ग्राहकांना बॉटल दिल्या जात असल्याचे चित्र होते; पण त्यासाठी ग्राहकांकडून पाच ते दहा रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत.

बेकरी, किराणा दुकान - या ठिकाणीही प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये सामान नकारण्यात आले; मात्र ब्रेडपुडा, दूधबॅगच्या रिकाम्या पिशव्या परत घेण्यास नकार मिळाला.

औषधी दुकाने - या ठिकाणी बंदीपूर्वीच कागदी पिशव्यांमध्ये ग्राहकांना औषधी दिली जात असल्याचे दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com