औरंगाबाद - ऊन आणि उकाडा जाणवत असताना मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत गुरुवारी (ता. 7) रात्री उशिरानंतर व शुक्रवारी (ता. 8) पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहराच्या काही भागांत पहाटे तासभर, सायंकाळी काहीकाळ सरी बरसल्या. जालना, परभणी, हिंगोलीच्या काही भागांतच पाऊस झाला.
मराठवाड्यातील सुमारे वीस महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात वीस दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्यानंतर मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली होती. आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. सकाळी आठपर्यंत तो सुरू होता. सुरवातीच्या अर्ध्या तासात सर्वदूर मुसळधार, त्यानंतर संततधार सुरू होती.
पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. बीड शहरातील दगडी पुलावरून बिंदुसरा नदीचे पाणी वाहू लागले. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात 75.72 टक्के पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यातील पांढरी, ब्रह्मगाव, बेलगाव, देविनिमगाव, कांबळी, सीना व इतर लहान-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागांत काल (ता. 7) रात्री; तसेच आज पहाटे जोरदार पाऊस झाला. वाशी तालुक्यास सर्वाधिक 70; तर कळंब तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत 20 मिलिमीटर पाऊस झाला. जालना शहरासह घनसावंगी, अंबड तालुक्यात पहाटे पावसाने चांगली हजेरी लावली.
|