औरंगाबाद - 'फॉर्म्युला तयार करून ऐक्य होत असल्यास माझा गट बरखास्त करायला तयार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांपासून सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे. समता सैनिक दलाच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत,'' असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. ऐक्यासाठी तयार नसलेल्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करीत त्यांनी भाषण आटोपते घेतले. या वेळी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने वातावरण चिघळले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर रविवारी आयोजित जाहीर सभा तणावपूर्ण वातावरणात पार पडली. समता सैनिक दलाच्या घोषणांनी वातावरण चिघळले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत एका कार्यकर्त्याचा आठवले यांच्याशी संवाद घडवून आणला. कडेकोट पोलिस बंदोबस्तात तासाभरात निवडक नेत्यांच्या छोटेखानी भाषणाने सभा आटोपती घेतली.
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून सभेत घोषणाबाजीला सुरवात होताच पोलिसांनी तत्काळ त्यांना घेराव घालत शांततेचे आवाहन केले. समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याचा आठवले यांच्याशी संवाद घडवून आणला. काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी झाली. पोलिसांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सभा संपेपर्यंत तणावाचे वातावरण होते.
|