पाच कोटींसाठी अडले ‘ए-वन’ दर्जाचे घोडे! 

पाच कोटींसाठी अडले ‘ए-वन’ दर्जाचे घोडे! 

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात नांदेड आणि औरंगाबाद रेल्वेस्थानकांत ‘ए-वन’ दर्जा मिळण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकाने वार्षिक उत्पन्नाचा पाच कोटी रुपयांचा पल्ला गाठला तरच हा दर्जा प्राप्त होणार असल्याची माहिती नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी रविवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. सिन्हा यांच्या पथकाने रविवारी औरंगाबाद रेल्वेस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या नांदेड विभागात औरंगाबाद व नांदेड या दोन रेल्वेस्थानकांना ‘ए’ हा दर्जा प्राप्त आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर रोज सोळा ते सतरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते; तर वर्षाकाठी साधारण ५० ते ५५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यात अजून पाच कोटी रुपयांची भर पडली आणि वार्षिक उत्पन्न साठ कोटींच्या पुढे गेले, तर औरंगाबाद रेल्वेस्थानकाला ‘ए-वन’ दर्जा मिळू शकतो. उत्पन्नवाढीसाठी मुख्य वाणिज्य विभागालाही सूचना दिल्या असल्याचे डॉ. सिन्हा यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नेहा रत्नाकर, ई. ई. विश्वनाथ, एन. विक्रमादित्य, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती.

या सुविधा मिळणार
औरंगाबाद रेल्वेस्थानकाला जर ‘ए-वन’ दर्जा प्राप्त झाला; तर या स्थानकाला सेवा, सुविधा पुरविण्यासाठी रेल्वेला कुठलीही मर्यादा राहणार नाही. आवश्‍यक सर्व सोयीसुविधांसह व्हीआयपी सेवाही तातडीने पुरविण्याचा निर्णय विभागीय व्यवस्थापकांना घेता येऊ शकतो, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. 

आज मुंबईत बैठक 
दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २०) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत महाप्रबंधक विनोद कुमार यादव विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. ‘देवगिरी’, ‘नंदीग्राम’, ‘तपोवन एक्‍स्प्रेस’ गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन त्या रेल्वेला प्रत्येकी २४ डबे जोडण्यात यावेत. अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच हे भुसावळ विभागाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे रेल्वेला कनेक्‍टिव्हीटी मिळत नाही. नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस लातूर मार्गे धावत असून, ती नियमित करण्यात यावी, सिकंदराबाद-मनमाड अजिंठा एक्‍स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत नेण्यात यावी, या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.

‘राजाराणी’चे भिजत घोंगडे
नांदेड-मुंबईसाठी नवीन रेल्वेगाडी देण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. ती लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नाही. याच मागणीच्या अनुषंगाने मुंबई-मनमाड राजाराणी एक्‍स्प्रेस नांदेडपर्यंत सुरू करावी, अशी मागणीही मध्य रेल्वेकडे केली आहे. राजाराणी एक्‍स्प्रेसला मनमाड येथे डबे जोडण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे; मात्र हा प्रश्‍न सुटला तर राजाराणी एक्‍स्प्रेस सुरू होऊ शकते, असा आशावाद डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com