आता ऐनवेळच्या विषयांना ‘नो एंट्री’

आता ऐनवेळच्या विषयांना ‘नो एंट्री’

औरंगाबाद - सर्वसाधारण सभेत ऐनवेळी मांडण्यात येणाऱ्या विषयामुळे महापौरांची बदनामी होत असल्यामुळे यापुढे ऐनवेळी विषय घेण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय नंदकुमार घोडेले यांनी घेतला आहे. श्री. घोडेले यांच्या पहिल्या सभेप्रमाणेच या वेळी ऐनवेळच्या विषयांचा पाऊस पडला होता. हे सर्व विषय आता पुढील सभेत घेण्यात येणार आहेत. 

सर्वसाधारण सभेत ऐनवेळी विषय मांडण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. अत्यंत आवश्‍यक असलेले विषय ऐनवेळी घेण्याची सोय असताना त्याचा दुरुपयोगच अधिक झाल्याचे प्रकार समोर आले. विशेषतः माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सभागृहात चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्‍यक असताना अनेक विषय ऐनवेळी मंजूर करून घेतले. त्यामुळे ऐनवेळचे प्रस्ताव चर्चेचा विषय ठरले आहेत.

 दरम्यान, श्री. घोडेले यांनीही पहिल्याच सभेत ऐनवेळच्या विषयांची परंपरा कायम ठेवली; मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेत ऐनवेळी काहीही होऊ शकते, असा टोला आमदार इम्तियाज जलील यांनी लगावला होता. त्यामुळे सोमवारी (ता. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयांना महापौरांनी कात्री लावली आहे. उशिराने दाखल झालेले विषय आता पुढील सर्वसाधारण सभेत घ्या, अशा सूचना महापौरांनी शनिवारी (ता. १६) केल्या. 

आमदार जलील यांनी मागविली माहिती 
आमदार इम्तियाज जलील यांनी नगर सचिव कार्यालयाला पत्र पाठवून आतापर्यंतच्या ऐनवेळच्या प्रस्तावांची माहिती मागविली आहे. दरम्यान, राज्य शासनानेही या विषयात विभागीय आयुक्‍तांकडून अभिप्राय मागविला आहे. राजेंद्र दाते यांनी ऐनवेळच्या ठरावांविषयी शासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत शासनाने विभागीय आयुक्‍तांकडून तातडीने अभिप्राय मागविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com