सात दिवसांत संपविले ३४ शेतकऱ्यांनी जीवन

सात दिवसांत संपविले ३४ शेतकऱ्यांनी जीवन

औरंगाबाद - सरकारी निकष लावून गेलेली कर्जमाफी, पेरण्या करूनही पुन्हा पावसाने दगा दिल्याने पिके करपलेली, शेतमालास न परवडलेला भाव अशा सततच्या प्रश्‍नांच्या माऱ्यामुळे गेल्या सात दिवसांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्यातील शेतीची सद्य:स्थिती गंभीर बनत चालली आहे. मागील चार वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदाही दृष्काळसदृश स्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यातच कुचकामी सरकारी यंत्रणा त्रासदायक ठरत आहे. यंदा तर पाऊस चांगला पडणार असा अंदाज व्यक्‍त केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बॅंका, तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेत वेळीच पेरणी केली. सुरवातीला पाऊसही पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र हा आनंद नेहमीप्रमाणे क्षणभंगूर ठरला. काही ठिकाणी पिकांनी जमिनीच्या वर डोके काढायला सुरवात करताच पाऊस गायब झाला. त्यामुळे पिके लगेच माना टाकायला लागली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडील माहितीनुसार ६ ते १४ ऑगस्टदरम्यान तब्बल शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शेतकऱ्यांना या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकार फारसे प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही.

जानेवारी ते जुलैपर्यंत मराठवाडा विभागात ५३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तोच आकडा ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपर्यंत तब्बल ५८० पर्यंत पोहोचला. या तेरा दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड जिल्ह्यात १२, नांदेड ९, परभणी ७, जालना ६, लातूर ५, उस्मानाबाद ४, तर हिंगोलीत एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. आत्महत्यांचा आकडा वेगाने वाढत असल्याने संकट किती भयावह आहे, हे लक्षात येते. 

शासन कागदी घोडे  नाचविण्यात दंग
जगाचा पोशिंदा शेतकरी गळ्यास फास आवळत जीवन संपविताना हे सत्र थांबविण्यासाठी कुठलेही प्रभावी प्रयत्न होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केले, आम्ही ते केले, असे सत्ताधारी सांगत आहेत. कर्जमाफीचा नेमका फायदा किती व कोणत्या लोकांना लाभ झाला, याची माहितीही त्यांच्याकडे नाही. आत्महत्येची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना राबविण्याची स्वतंत्र यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नाही. शासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम वेगात सुरू आहे, असेच म्हटले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com