औरंगाबाद - राज्यातच नव्हे, तर परदेशात मोर्चा काढूनही मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने एकवटण्याची हाक देण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट क्रांतिदिनी औरंगाबादेतून सुरू झालेला क्रांती मोर्चाचा झंझावात येत्या नऊ ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारा हा क्रांती मोर्चा इतिहास घडवेल, अशी भावना राज्य समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली; तसेच रविवारी (ता. 18) नाशिक येथे राज्यव्यापी बैठक होणार आहे.
राज्य समन्वय समितीची आज औरंगाबाद येथे बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाला एकत्र जोडण्याचे काम केलेले आहे. येथील मोर्चाच्या माध्यमातून शांतता आणि संयमाची अलिखित आदर्श आचारसंहिता राज्यभर, देश आणि विदेशात गेली. त्याचे समाजाने अनुकरण करून मूक मोर्चातूनही आपली ताकद दाखवून दिली. प्रत्येक तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चातून केलेल्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने पावले उचलली गेली नाहीत. उलट समाजात फूट पाडण्याचे काम केले. गेल्या सहा जूनला शिवराज्याभिषेकदिनी रायगड येथे शपथ घेत मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी समाजाने एकमुखी निर्धार व्यक्त केला. त्यानुसार राज्यभरात मुंबईतील महामोर्चाची तयारी केली जात असल्याची माहिती येथे देण्यात आली.
कोपर्डीत 13 जुलैला क्रांतिज्योत
दरम्यान, येत्या रविवारी नाशिक येथे औरंगाबाद रोडवर झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मोर्चाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. न्याय मिळत नाही, तोपर्यंत विविध प्रकारच्या आंदोलनांद्वारे जागरुकता निर्माण केली जाईल. त्यानंतर एकत्र झालेला समाज मुंबईतील मोर्चात उतरेल. 13 जुलैला नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे राज्यातील मराठा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक क्रांतिज्योतीला श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर मोर्चाच्या तयारीला वेग येईल, असे महिला समन्वयक सुचिता जोगदंड, रेखा वाकडे, किरण महेश काळे, मीनाक्षी डायगव्हाणे यांनी सांगितले. या वेळी विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|