औरंगाबाद - 'वैद्यनाथ कारखान्याच्या आडून कारखान्याची व माझी बदनामी केली जात आहे. मला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे हे प्रयत्न आहेत,'' असा आरोप ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 25) केला.
सरकारच्या "सरस सिद्धा महोत्सवा'च्या उद्घाटनासाठी मुंडे येथे आल्या होत्या. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
मुंडे म्हणाल्या, 'वैद्यनाथ साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांच्या किंवा सभासदांच्या काहीही तक्रारी नाहीत. मराठवाड्यात उसाचे उत्पादन वाढले आहे. बंद साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. सत्तापरिवर्तनानंतर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये डावलले जात असल्याची भावना निर्माण होऊ नये, यासाठी आपण स्वतः लक्ष देणार आहोत.''
'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना "मेस्मा' लागू करण्याची भूमिका आपण आग्रहीपणे मांडत होतो. कर्मचारी संपावर गेल्यानंतर अंगणवाडीतील बालके आठ-आठ दिवस उपाशी राहतात. कुपोषणाची समस्या वाढू नये, यासाठी बालकांना नियमित आहार देणे आवश्यक आहे. त्यामुळेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना "मेस्मा' लागू करण्याचा निर्णय एकत्रित बसून घेतला होता,'' असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. तथापि, आम्हाला विचारणा करूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|