पाणीबाणीचे संकट टळले

पाणीबाणीचे संकट टळले

औरंगाबाद - महापालिकेने थकबाकी सोडून किमान चालू महिन्याचे अडीच कोटी रुपयांचे वीज देयक २४ तासांत भरावे; अन्यथा पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी कापू, असा इशारा महावितरणने महापालिका प्रशासनाला नोटिसीद्वारे दिला होता. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी हालचाली करत इतर कामे बाजूला ठेवा, पहिले महावितरणचे बिल भरा, अशा सूचना लेखा विभागाला केल्या.

दरम्यान, बुधवारी लेखा विभागाने बिल देण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली असून, गुरुवारी (ता. २३) आरटीजीएस पद्धतीने दोन कोटी ५३ लाख रुपयांचे बिल महावितरणच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून समाधानकारक नाही. एलबीटीच्या मिळणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते तर मालमत्ता करवसुलीतून जमा होणाऱ्या रकमेतून ठेकेदारांची बिले तसेच इतर कामे करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यात अनेक वेळा पाणीपुरवठ्याचे, पथदिव्यांचे वीज बिल थकीत राहते. सध्या पाणीपुरवठ्याच्या बिलाची थकबाकी दोन कोटी ५३ लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे महावितरणने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली होती. 

आज भरणार रक्कम
या नोटिसीची माहिती मिळताच मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त आयुक्त आणि लेखा विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बुधवारी हे बिल भरण्यात यावे, असे आदेश लेखा विभागाला दिले होते. त्यानंतर स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनीही इतर कामे बाजूला ठेवा, वीज कंपनीचे बिल तातडीने भरा, असे आदेश दिले. त्यानुसार, बुधवारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, एका सहीमुळे ही फाईल थांबलेली होती. सायंकाळी शेवटची सही झाली, तोपर्यंत रक्‍कम आरटीजीएस करण्याची वेळ निघून गेली होती. गुरुवारी सकाळी ही रक्‍कम जमा करण्यात येणार असल्याचे श्री. बारवाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com