सात हजार नळ वाढल्याने पाणीटंचाईच्या झळा 

सात हजार नळ वाढल्याने पाणीटंचाईच्या झळा 

औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना शहरात शंभर किलोमीटरची नवी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सुमारे सात हजार नळ कनेक्‍शन वाढले आहेत. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने पाणी कमी पडत असल्याचा नवा दावा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी गुरुवारी (ता. २४) केला. 

शहरातील पाणीपुरवठ्याचा महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आढावा घेतला. त्यावेळी श्री. चहेल यांनी सांगितले, की तीन दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होत आहे; मात्र दोन ते तीन तास उशिराने पाणी दिले जात असल्याचे ते म्हणाले. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने  हर्सूल येथील तलावाने तळ गाठला. त्यानंतर हर्सूलमधून मिळणारे पाच एमएलडी पाणी कमी झाले. नाथसागरातील पाणी पातळी घटल्यामुळे सहा एमएलडीची तूट येत आहे. तसेच कडक उन्हामुळे बाष्पीभवन वाढले असल्याचा दावा त्यांनी केला. पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे असताना एक लाख २८ हजार नळ होते. दीड वर्ष सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठा योजना वर्ग करण्यात आली होती. त्यावेळी शंभर किलोमीटरची नवी पाईपलाईन टाकण्यात आली. सात हजार कनेक्‍शन वाढले. आता कनेक्‍शनचा आकडा एक लाख ३५ हजारांवर गेला आहे, असा दावा त्यांनी केला. 

तमिळनाडूचे पथक येणार 
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तमिळनाडूच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घेतला आहे. हे पथक २९ मेला शहरात दाखल होणार आहे. त्यांच्यासोबत जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही असतील, असे श्री. चहेल यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com