रेशनसाठी बायोमेट्रिकच्या घोळामुळे कार्डधारकांची अडचण

रेशनसाठी बायोमेट्रिकच्या घोळामुळे कार्डधारकांची अडचण

बीड  - सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेशन दुकानावर ई-पॉस मशिन बसवून शासनाने ते आधार क्रमांकाशी जोडले आहेत. आता रेशनचे धान्य घेण्यासाठी कुटुंबप्रमुखाला किंवा कुटुंबातील सदस्याला बोटाचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागत आहे. मात्र राज्यातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक कार्डधारकांचे बोटांचे ठसेच आधारशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या कार्डधारकांच्या धान्य वाटपाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यातच शासनाने ई-पॉसची अंमलबजावणी सुरू केली असून त्यावरच दुकानदारांचे वाढीव कमिशन ठरविल्याने आता आधारमधील बायोमेट्रिकचा घोळ रेशन दुकानदारांसह सामान्य नागरिकांसाठी अडचणीचा ठरत आहे. 

पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीवरून ही बाब अधिकच स्पष्ट होत आहे. धान्याचे लाभार्थी असलेल्या ५६ टक्‍क्‍यांहून अधिक कार्डधारकांचे बायोमेट्रिक (बोट अथवा अंगठ्याचे ठसे) जुळत नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक फरकाने हेच चित्र आहे. आधार नोंदणी करताना जे गोंधळ झाले, त्यातून ही परिस्थिती उद्‌भवली आहे. ई-पॉस मशिन थेट आधार कार्डाशी लिंक करण्यात आल्याने बायोमेट्रिक न जुळल्यामुळे संबंधित व्यक्तीला ई-पॉस प्रणालीतून धान्यच देता येत नाही, असे चित्र आहे. पुरवठा विभाग रेशन दुकानदारांना ई-पॉसची सक्ती करत आहे आणि बायोमेट्रिकची अडचण रेशन दुकानदारांसमोर येत आहे. या परिस्थितीत अगोदरच महागाईने पिचलेले सामान्य नागरिक मात्र सवलतीच्या दरातील धान्यापासूनही वंचित राहू लागले आहेत. 

विद्यार्थ्यांनाही बसतोय आधारमधील चुकांचा फटका  
शासनाने विद्यार्थ्यांसाठी देखील आधार कार्ड सध्या सक्तीचे केले आहे. आधार क्रमांक दिल्याशिवाय शाळेत विद्यार्थ्याची नोंदणीच होत नाही. मात्र बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांचे पालकही तितकेसे साक्षर नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांच्या नावात किंवा बायोमेट्रिकमध्ये चुका झाल्या आहेत. काही ठिकाणी जन्मतारीख अर्धवट आली आहे आणि आता हे आधार अपडेट करण्याचा भुर्दंड सामान्यांना बसत आहे. शाळा प्रवेशापासून ते बॅंक व्यवहार व अनेक सोयी-सवलतीसाठी आधार गरजेचा आहे. परंतु अनेक ठिकाणी नंबर असूनही त्याचा उपयोग होत नाही. सध्या विद्यार्थ्यांची माहिती भरणे चालू असून आधार नंबर हा प्रमुख मुद्दा आहे. परंतु प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर जवळपास ८५ टक्के विद्यार्थी आधारशी जोडले जात नाहीत. कुणा विद्यार्थ्यांच्या नावात ‘स्पेलिंग मिस्टेक’ तर काहींची जन्मतारीख चुकीची आहे. नंबर आणि कार्डवरील फोटो त्याच व्यक्तीचा असताना केवळ एखाद्या अक्षराच्या चुकीमुळे तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येत नसेल आणि तो विद्यार्थी शाळेत असून त्याच्याकडे आधार कार्ड असतानाही शाळाबाह्य दिसत असेल तर चूक कोणाची? शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला आधार लिंक करण्याचे सक्त आदेश दिले आहेत आणि हे काम ३० सप्टेंबरपर्यंत करायचे आहे. त्यावरच शाळांना पुढील संचमान्यता दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु विद्यार्थी वर्गात असतानाही आधारमधील चुकांमुळे तो पात्र यादीत येत नसल्यामुळे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी शाळेसह पालकांची धावपळ सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com