आठ गावांत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

आठ गावांत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

बीड - गावांमधील आरोग्य, शिक्षण, शेती, व्यवसाय व गुणवत्तापूर्ण पायाभूत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील १८० गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील चार तालुक्‍यांतील आठ गावांचा समावेश आहे. या गावांसाठी महसूल आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांची तालुका संपर्क अधिकारी, तर प्रत्येक गावामध्ये एका मुख्यमंत्री ग्रामविकास परिवर्तक दूताचीही निवड केली आहे. या मोहिमेत ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ स्त्रीप्रतिष्ठा अभियानाचीही साथ आहे.   
ग्रामीण भागाचा शास्वत विकास होऊन ही गावे आदर्श व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्यातील एक हजार गावांमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यास सुरवात झाली आहे. यासाठी एक हजार गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १८० गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ गावे निवडून नऊ जूनपासून या गावांमध्ये कामाला सुरवातही झाली आहे.  

असा होणार शास्वत विकास
निवड झालेल्या गावांमध्ये तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानच्या सदस्या, मुख्यमंत्री ग्रामविकास परिवर्तक दूत हे गावकऱ्यांच्या साथीने गावातील शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार व गावातील पायाभूत विकासाचा सर्व्हे केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी ६० प्रश्‍नांची प्रश्‍नावली असून एकूण पाच विषयांवरील ३०० प्रश्‍नांची प्रश्‍नावली ग्रामस्थांकडून भरून घेतली जाईल. या महिन्यात या सर्व्हेचे काम करून या सर्व प्रश्‍नावली एकत्रित्रत करून गावचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर त्या गावाला चार लाख रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात गावाची लोकसंख्या, ग्रामपंचायतींची स्थिती  याचा अभ्यास करून गावाचा शास्वत विकास करण्यासाठी आवश्‍यक बाबींचा आराखडा विकास योजना राबविण्यात येतील.

पुढील ११ महिने हे काम चालणार आहे. ग्राम परिवर्तन दूतांचे पुणे येथील यशदामध्ये प्रशिक्षणही झाले आहे.  

संपर्क अधिकारी व ग्रामविकास दूत
केज तालुक्‍यातील चंदन सावरगावसाठी गटविकास अधिकारी उमेश नंदागौळी हे तालुका संपर्क अधिकारी आहेत. तर दादासाहेब गायकवाड ग्रामविकास परिवर्तक दूत आहेत. याच तालुक्‍यातील पळसखेडासाठी तहसीलदार अविनाश कांबळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला हे तालुका संपर्क अधिकारी तर रोहित काळे दूत आहेत. परळी तालुक्‍यातील करेवाडीसाठी गटविकास अधिकारी संजय केंद्रे संपर्क अधिकारी तर प्रमोद जाधव हे दूत असतील. याच तालुक्‍यातील परचोंडी गावासाठी तहसीलदार शरद झाडके व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे संपर्क अधिकारी तर रोहित काळे दूत असतील. धारुर तालुक्‍यातील व्हटकरवाडीसाठी श्रीमती कांबळे या तालुका संपर्क अधिकारी तर दीपक पवळ दूत असतील. याच तालुक्‍यातील कोळपिंप्रीसाठी तहसीलदार राजाभाऊ कदम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक हे संपर्क अधिकारी तर आसाराम हातागळे दूत असतील. अंबाजोगाई तालुक्‍यातील हिवरा खुर्द गावासाठी गटविकास अधिकारी डी. बी. गिरी संपर्क अधिकारी तर मधुकर पकाले दूत असतील. याच तालुक्‍यातील मांडवा पठाण गावासाठी तहसीलदार शरद झाडके व उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी हे तालुका संपर्क अधिकारी व वैजिनाथ इंगाले दूत असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com