औरंगाबाद : लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. त्याअनुषंगाने शहरात वेगवेगळ्या समाजातील वधू-वर व पालक मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. तिला तो नोकरीवाला, तर त्याला ती गृहिणी, सुशिक्षित आणि समंजस हवी, अशी अपेक्षा सकल जैन समाजातर्फे संत तुकाराम नाट्यगृहात रविवारी (ता. 19) आयोजित अकराव्या वधू-वर मेळाव्यात विवाहोच्छुकांनी व्यक्त केली.
सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष तथा आमदार सुभाष झांबड, महापौर भगवान घडामोडे, अखिल भारतीय सैतवाल समाजाचे अध्यक्ष दिलीप घेवारे, सकल मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष संजय मंत्री, सतीश जैन आणि राजीव बुबणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याला सुरवात झाली. त्यानंतर कलिकुंड पार्श्वनाथ जैन मंदिरातील विद्यासागर पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी "बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, हा संदेश देणारी लघुनाटिका सादर केली. त्यानंतर विवाहेच्छुक 250 वधू, 300 वरांनी क्रमाक्रमाने नाव, पत्ता, मूळगाव, व्यवसाय आणि कौटुंबिक माहिती व्यासपीठावर येऊन सादर केली. दुसरीकडे पालकांनीही एकमेकांशी ओळख करवून घेतली. या मेळाव्यात महाराष्ट, मध्य प्रदेश आणि गुजरातहून विवाहेच्छुक सहभागी झाले होते. मेळाव्यासाठी जमा झालेल्या निधीतून एक लाख रुपयांची बचत करत जैन समाजातील मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिलीप घेवारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यासाठी अध्यक्ष श्रीकांत वायकोस, कार्याध्यक्ष जीवनकुमार अन्नदाते, विलास साहुजी, दिगंबर क्षीरसागर, सुनील वायकोस, रमेश घोडे, लक्ष्मीकांत कटके, नीलेश सावळकर, संदीप वायकोस, लक्ष्मीकांत संघई, दिलीप चौधरी, सुशील वायकोस आणि शोभा देशमाने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपाध्यक्ष विलास साहुजी यांनी केले.
मेळाव्याचे अकरावे वर्ष
वधू-वर परिचय मेळाव्यात तीन राज्यांतील साडेपाचशे विवाहेच्छुकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दहावीपासून ते उच्चशिक्षित डॉक्टर, अभियंते, वकील, व्यापारी, शिक्षक, खासगी व शासकीय नोकरदार सहभागी होतात. मेळाव्याचे अकरावे वर्ष असल्याने या मेळाव्यातून प्राथमिक बोलणीचालणी होते. त्यानंतर अनेक विवाह जुळतात, हे या मेळाव्याचे यश असल्याचे मत अध्यक्ष श्री. वायकोस यांनी व्यक्त केले.
|