उदगिरात घरफोडीची दहशत 

crime-logo
crime-logo

उदगीर - उदगीर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरुच आहे. एकाच दिवशी अनेक घरे व दुकानांची कुलुपे तोडून चोऱ्या होत आहेत. शिवाय चोरट्यांचा तपास लागत नसल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. 

मंगळवार (ता.27) ते गुरुवार (ता.29) यादरम्यान वेळाअमावास्येच्या काळात चोरट्यांनी शहरातील शेतकी निवास परिसरातील तीन घरे, तर जय संतोषीमाता नगरमधील दोन घरांची कुलुपे तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

घटना पहिली 
शेतकी निवास परिसरात राहणारे अडत व्यापारी श्रीकांत बाबूराव मठपती हे मंगळवार ते गुरुवारदरम्यान वेळाअमावास्येनिमित्त सहकुटुंब त्यांच्या पंढरपूर (ता. देवणी) या मूळ गावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या पहिल्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख रुपये रोख व दागिने असा एकूण दोन लाख पंचावन्न हजारांचा ऐवज लंपास केला आहे. 

घटना दुसरी  
अडत व्यापारी श्री. मठपती यांच्या घरात राहणारे भाडेकरू बापूराव डिगोळे चिघळी (ता. उदगीर) या मूळ गावी गेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने असा एकूण एक लाख बस्तीस हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या दोघांचा मिळून रोख रकमेसह चार लाख सत्तावीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवल्याची तक्रार श्री. मठपती यांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार घोगरे अधिक तपास करत आहेत. 

घटना तिसरी 
जय संतोषीमाता नगर येथे भाड्याने राहणारे शिवाजी माधव पांचाळ हे लाकडाचे व्यापारी असून ते वेळाअमावास्येनिमित्त नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेले असता चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने असा एकूण चौदा हजार एकशे सत्तर रुपयांचा ऐवज पळवला. 

घटना चौथी 
जय संतोषीमाता नगरात याचदरम्यान श्री. पांचाळ यांचे शेजारी शेषेराव बिरादार यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह एकोणीस हजाराचा ऐवज लंपास केला आहे. श्री. पांचाळ यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फौजदार विजय पाटील अधिक तपास करीत आहेत. 

ग्रामीण पोलिसांनी एकास पकडले 
चोरीची तक्रार दाखल झाली असताना पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या पथकाला एका चोरट्यास पकडण्यात यश आले असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. मात्र शहरात दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. 

डीबी शाखा गेली कुठे? 
डीबी शाखा म्हणजे पोलिस ठाण्याचा आत्मा समजला जायचा. गुन्हेगारी व चोरीवर आळा बसवण्यासाठी डीबी शाखेने महत्वपूर्ण कामगिरी मागील काळात केली होती. मात्र, सध्या या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने शहर पोलिस ठाण्याची डीबी शाखा गेली कुठे? असा प्रश्न नागरिक व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com