देवणी - नागरिकास मारहाण केल्याप्रकरणी चार पोलिसांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील न्यायालयाने सुनावली.
टाकळी येथील दस्तगीर अहमदसाहब शिरुरे यांना 20 नोंव्हेबर 2005 ला वलांडी (ता. देवणी) बसस्थानक परिसरात राजकुमार शिवाजीराव गुळभिले, बाळासाहेब रघुनाथ कन्हेरे, मारोती विठ्ठल महानवर, श्रीमंत मोरे या पोलिसांनी काठीने जबर मारहाण केली होती. याबाबत दस्तगीर शिरुरे यांनी देवणी फौजदारी न्यायालयात दावा दाखल केला होता.
न्यायाधीश डी. पी. कासट यांनी मंगळवारी (ता. 24) चारही पोलिसांना एक वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, पोलीस विरुद्ध सामान्य नागरिकातील 13 वर्षे सुरू असलेल्या या लढ्याच्या निकालाबाबत उत्सुकता होती.
पोलिस प्रशासनात खळबळ
दरम्यान, या तालुक्यात नागरिक आणि पोलिसांतील वाद यापूर्वी झाले आहेत. विविध कारणांमुळे सलग तीन पोलिस निरीक्षकांना तालुक्यातून जाताना अडचणींचा सामना करावा लागला होता. याशिवाय वलांडी येथे बसस्थानकावर एका नागरिकाला झालेल्या मारहाणीनंतर काही पोलिस निलंबित झाले होते. आता चौघांना झालेल्या शिक्षेमुळे तालुक्याच्या पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
|