दुष्काळ घोषित करण्याबाबत प्रस्ताव पाठविणार

Drought
Drought

औरंगाबाद - पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून दुष्काळ घोषित करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीच्या संदर्भात श्री. चौधरी यांची भेट घेतली असता, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सुरवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, नंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यातील एकूण ६५ मंडळांपैकी सुमारे ४८ मंडळांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे.

यात १३ मंडळांत २५ ते ५० टक्के पाऊस पडलेला आहे, तर ३५ मंडळांत ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झालेला आहे. अनेक गावांत तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूरसह आदी भागांत परिस्थिती इतर तालुक्‍यांच्या तुलनेत वाईट असल्याचे निदर्शनास आले आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा शासनदरबारी पाठविण्यात येत आहे. ज्या भागात टंचाई किंवा दुष्काळसदृश परिस्थिती आहे, अशा ठिकाणी दुष्काळ घोषित करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीडशे टॅंकर सुरू
जिल्ह्यात आजघडीला सुमारे दीडशे टॅंकर सुरू आहेत. आणखी काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी खरिपाच्या पिकांनी मान टाकलेली आहे. ज्या ठिकाणी पिके तग धरून आहेत तेथेही उत्पन्नात ३५ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत घट होणार असल्याचा सूर शेतकरी वर्गातून निघत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com