साहेब, कर्ज कसे भरायचे सांगा?

वडगाव-लाख (ता. तुळजापूर) - सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री अर्जुन खोतकर. या वेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आदी.
वडगाव-लाख (ता. तुळजापूर) - सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री अर्जुन खोतकर. या वेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आदी.

उस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले, तलाव कोरडाठाक आहेत. कसे कर्ज भरायचे सांगा? जोडीला चाऱ्याचा मोठा प्रश्‍न आहेच. फेडरेशनला नोंद करूनही हरभऱ्याच्या फरकाची रक्कम शासनाने दिली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केली, त्यालाही सात महिने उलटले. अद्याप काहीच दिले नाही. नुसती आश्‍वासने मिळतायेत...’’  दुष्काळाने होरपळलेला एक शेतकरी कधी संतापाने तर कधी हतबलतेने व्यक्त होत होता. त्यांच्यासमोर खुद्द पालकमंत्री अर्जुन खोतकर यांची बोलतीच बंद झाली! 

वडगाव-लाख (ता. तुळजापूर) येथे पालकमंत्र्यांनी पिकांची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना विचारले, की जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यावर काय करायला पाहिजे? त्यावेळी एका शेतकऱ्याने वरील हकिकत सांगताच पालकमंत्री निरुत्तर झाले. श्री. खोतकर यांनी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भेट देऊन दुष्काळी स्थितीची सोमवारी (ता. १५) पाहणी केली.

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत सवांद साधला. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.

दुष्काळ कधी जाहीर होणार? 
जिल्ह्याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा लागेल. तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतील, त्याशिवाय काही पर्याय नाही. जिल्हाधिकारी स्वतःचा अहवाल शासनाला सादर करतील. मंत्रीही दुष्काळाची पाहणी करून अहवाल देणार आहेत. केंद्रीय पथक दौऱ्यावर येण्यापूर्वी राज्याचा अहवाल तयार असेल. केंद्रीय पथक राज्यात एक, दोन, तीनवेळा दौऱ्यावर येईल. त्यानंतर दुष्काळ जाहीर होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. दरम्यान, जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

पेरणीच नाही, पाहणीत वेळ कशाला घालविता? 
जिल्ह्यात रब्बीची पेरणीच नाही. पावसाअभावी विहिरी कोरड्या पडत आहेत. कूपनलिका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही दुष्काळाची मंत्र्यांनी, केंद्रीय पथकाने पाहणी करणे, यामध्ये वेळ तसेच पैसे वाया का घालविला जात आहे, असाही प्रश्‍न काही शेतकरी पालकमंत्र्यांच्या पाहणीदरम्यान उपस्थित करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com