औरंगाबाद ते मुंबई एकतेचा इतिहास; 'कोपर्डी'नंतर एकवटला मराठा समाज 

maratha-kranti-morcha
maratha-kranti-morcha

औरंगाबाद : कोपर्डी येथील घटनेनंतर औरंगाबादेतून 9 ऑगस्ट 2016 या क्रांतिदिनी काढलेल्या ऐतिहासिक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठा समाज एकवटला. मोर्चाची शिस्त, आचारसंहिता पाळत एकापाठोपाठ एक राज्य, देशपातळीवर भव्य मोर्चे निघाले. यानंतरच सरकारला कोपर्डीचे भयाण वास्तव स्वीकारावे लागले. मनातील संताप शांततेत मांडणारे मोर्चे देशात पहिले ठरले. कोपर्डी प्रकरणी बुधवारी (ता. 29) न्यायालयाचा निकाल जाहीर केल्यानंतर सर्वत्र पहिल्या मोर्चाच्या चर्चा होत आहेत. 

कोपर्डी येथे बलात्कार, खुनाची घटना घडल्यानंतर मराठा समाजाच्या संतापाचा भडका उडाला. त्यानंतर पहिली महत्त्वपूर्ण बैठक शहरात झाली. समाजबांधवांनी 9 ऑगस्टला विराट मोर्चाची हाक दिली. चर्चेतून त्यास मराठा क्रांती मोर्चा हे नाव देण्यात आले. गावागावांतून, घराघरांतून पुरुष मंडळींसोबतच महिलाही रस्त्यावर उतरल्या. क्रांती चौक परिसरात सकाळी 11 च्या सुमारास कधी नव्हे एवढ्या प्रचंड संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. मोर्चा शांततेत, शिस्तीतच असेल, याची काळजी समन्वयकांनी घेतली होती. यात शिस्तीचा आदर्श ठेवून स्वयंसेवक शांततेचे आवाहन करीत होते. प्रत्येक मोर्चात सर्वात पुढे तरुणी, महिलांचा समावेश होता. त्यांच्यामागे युवक, नागरिकांच्या दुचाकी होत्या. हा मूक मोर्चा पैठणगेट, गुलमंडी चौक, गांधीपुतळा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला, तरुणींनी निवेदन दिल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला होता. पुढे राज्यभरात एकापाठोपाठ एक असे लाखोंचे मोर्चे निघाले. हीच शिस्त आणि शांतता या मोर्चांमध्ये कायम राहिल्याने औरंगाबादेत निघालेला मोर्चा दिशादर्शक ठरला. मराठा समाजातील महिला, राजकीय नेते, विचारवंत, डॉक्‍टर्स, अभियंते, वकील, उद्योजक, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आदी सर्वच घटकांतील समाजबांधव या मोर्चात सहभागी होते. 

राज्यभर निघालेल्या मोर्चांनंतर सरकारने मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याने संतप्त मराठा समाजाने मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतिदिनी महामोर्चाची हाक दिली. त्या पार्श्‍वभूमीवर 1 ऑगस्ट 2017 ला शहरातून जनजागृतीसाठी काढण्यात आलेली भव्य वाहन रॅलीही ऐतिहासिक ठरली. 

राजधानीत एकतेचा इतिहास घडविला
राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व मोर्चांचे विक्रम मोडीत काढीत मुंबईतील मराठा क्रांती महामोर्चा ऐतिहासिक ठरला. यानिमित्ताने मराठा समाजाची राजधानीत एकजूट दिसून आली. शहर आणि ग्रामीण भागातून लाखोंच्या संख्येनी मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करतानाचे चित्र राज्यभर दिसले. 
विशेष म्हणजे प्रत्येक मोर्चाचे केंद्रही औरंगाबादच राहिल्याने कोपर्डी प्रकरणाच्या अनुषंगाने मोर्चाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

औरंगाबादकर कुटुबीयांसह मोर्चात
पहिला मोर्चा यशस्वी करण्यात महिलांचा वाटा मोलाचा राहिला. पुन्हा एकदा वर्षभराने त्याच दिवशी निघणाऱ्या महामोर्चात तोच जोश घेऊन अनेक जण मुंबईत दाखल झाले होते. आम्ही दाखल झालो, तुम्ही कधी येताय, अशी टॅग लाईन देत सोशल मीडियावर मोर्चाची हाक देण्यात आली होती. त्यामुळे या मोर्चाने वेगळेपण सिद्ध केले. कधी नव्हे एवढ्या महिला रस्त्यावर उतरल्याचे या मोर्चातून दिसून आले. जागे व्हा, बाहेर निघा, एक व्हा! "अभी नहीं तो कभी नहीं, अशा प्रकारे महिलांकडून आवाहन केले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com