उस्मानाबाद - शेतकऱ्यांप्रश्नी एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे सत्ताधारी-विरोधक काहीच करीत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी (ता. 24) येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, की शेतमालाला हमीभाव द्यायचा नाही, उसाला "एफआरपी' द्यायची नाही. वेगवेगळी आश्वासने देऊन फसवणूक करायची. त्यातून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक आत्महत्येच्या मार्गावर लोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकमेकांवर आरोपांशिवाय काहीच करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रश्नी 14 मे रोजी राज्यात सर्वत्र जेल भरो आंदोलन केले जाणार आहे. या दिवशी राज्यातील तुरुंग अपुरे पडतील, एवढा प्रतिसाद या आंदोलनाला मिळेल.
देशात मुक्या प्राण्यांना मारल्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्यासाठी कडक कायदा आहे. मात्र देशात दररोज सरासरी बारा शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यावर कोणतीच उपाययोजना नाही, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचेही पाटील म्हणाले. संघटनेचे कालिदास आपेट, किशोर ढमाले यांनीही शासनाच्या धोरणावर टीका करीत जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
|