समृद्धी महामार्गावर टाउनशिप बांधण्याचा घाट - मेधा पाटकर

समृद्धी महामार्गावर टाउनशिप बांधण्याचा घाट - मेधा पाटकर

औरंगाबाद - शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाउनशिप बांधण्याचा घाट सरकारने घातला आहे. विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास विरोध करण्यासाठी वरूड काझी (ता.जि. औरंगाबाद) येथे समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा शुक्रवारी झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांची बळजबरीने जमीन घेतली जात असल्याचा आरोप होत आहे, याच पार्श्‍वभूमीवर प्रकल्पग्रस्तांचा हा मेळावा घेण्यात आला. या वेळी मेधा पाटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, 'प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून त्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात असून, एकप्रकारे शेतीची हत्या केली जात आहे. समृद्धी कुणाची आणि बरबादी कुणाची, हे आता शेतकऱ्यांना कळून चुकले असून, त्याविरोधात खंबीरपणे लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पर्यावरणीय सुनावणीपूर्वी सगळ्या परिणामांचे अभ्यास शेतकऱ्यांसमोर आले पाहिजेत.''

राज्याचे कृषिमंत्री विदेश दौऱ्यावर असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. मेळाव्याला मेधा पाटकर, सेझविरोधी आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, सुनीती सु. र., स्वराज अभियानाचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com