तुळजापूर - इंधन दरवाढीचा फटका बत्तासे बनविणाऱ्या कारागिरांनाही बसला आहे. अधिक मासानिमित्त वाण देण्यासाठी महिला बत्ताशांचा वापर करतात. त्यांनाही महागाईला तोंड द्यावे लागत आहे.
तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकमास हा महिलांना वाण देण्यासाठी शुभ कालावधी समजला जातो. अधिक मासानिमित्त महिला साखरेपासून तयार केलेले बत्तासे वेगवेगळ्या देवतांना वाण म्हणून देतात. साखरेचा दर 30 रुपये प्रतिकिलो झाला आहे. बत्तासे बनविण्यासाठी साखर स्वस्त झाली असली, तरी डिझेल महागले आहे. पूर्वी कोळसा आणि लाकडाचा इंधन म्हणून वापर करून बत्तासे तयार केले जात होते. खुल्या बाजारात रॉकेल मिळत नसल्याने प्रदूषण टाळण्यासाठी बहुतांश कारागीर, व्यापाऱ्यांनी डिझेल वापर सुरू केला आहे. अनेक किराणा व्यावसायिक; तसेच ग्रामीण भागातील व्यापारी अधिकमासानिमित्त बत्ताशांची मोठी खरेदी करतात.
साखर स्वस्त असूनही डिझेलचे दर वाढल्याने बत्ताशांचा भाव वाढविणे भाग पडले आहे. इंधन आणि कामगारांची मजुरी यांचा ताळमेळ घालणे बत्तासे व्यावसायिकांना कठीण होते. परिणामी, दरवाढ हाच पर्याय आहे.
- उमेश गवते, बत्तासे व्यावसायिक, तुळजापूर
|